नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला संघांतील पाच सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेला आज, शनिवारपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत चमकदार कामगिरी करण्यासह पुढील वर्षीच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकापूर्वी इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचेही भारताचे लक्ष्य असेल.

विश्वचषकासाठी वर्षभराचा कालावधी शिल्लक असला, तरी गेल्या वर्षी साखळी फेरीतच गारद झालेल्या भारतीय संघासाठी ही मालिका खूप महत्त्वपूर्ण आहे. सलामी फलंदाज शफाली वर्माचे पुनरागमन झाले असून क्रांती गौड, श्री चरनी आणि सायली सातघरे यांसारख्या युवा खेळाडूंनाही या दौऱ्यात संधी देण्यात आली आहे. उमा छेत्रीला सलामीला खेळताना फारसे प्रभावित करता आलेले नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात शफाली आणि स्मृती मनधाना डावाची सुरुवात करण्याची शक्यता आहे.

भारताचा हा वर्षातील पहिला ट्वेन्टी-२० सामना आहे. अष्टपैलू स्नेह राणा आणि अमनजोत कौर यांच्या पुनरागमनाकडेही सर्वांचे लक्ष असेल. राणा फेब्रुवारी २०२३ नंतर प्रथमच ट्वेन्टी-२० संघात परतली आहे. महिला प्रीमियर लीगमधील चांगल्या कामगिरीमुळे तिचा आत्मविश्वास दुणावला असेल. रेणुका सिंह ठाकूर आणि पूजा वस्त्रकार दुखापतीमुळे या दौऱ्यात खेळू शकणार नाहीत. त्यामुळे अन्य गोलंदाजांची कसोटी लागेल.

भारतीय संघासाठी या दौऱ्याची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांना दोन्ही सराव सामन्यांत पराभव पत्करावा लागला. आता त्यांच्यासमोर नॅट स्किव्हर-ब्रंटच्या नेतृत्वाखालील मजबूत इंग्लंड संघ असेल. भारतीय संघाची भिस्त कर्णधार हरमनप्रीत कौर, मनधाना, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष आणि दीप्ती शर्मा यांच्यावर असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वेळ : सायं. ७ वा.
थेट प्रक्षेपण : सोनी टेन १, ३.