बहुप्रतिक्षित IPL 2020ची अधिकृत घोषणा BCCIने ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीलाच केली. युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून स्पर्धेची सुरुवात होणार आहे. तर स्पर्धेचा अंतिम सामना १० नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे हेदेखील स्पष्ट करण्यात आले. ड्रीम ११ला यंदाचे टायटल स्पॉन्सर्स जाहीर करण्यात आले. २० ऑगस्टपासून सर्व संघांना युएईला जाण्याची परवानगी देण्यात आली. त्यानुसार सर्व संघ आणि खेळाडू युएईमध्ये दाखलही झाले. पण स्पर्धेचं वेळापत्रक मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे BCCI किंवा IPL गव्हर्निंग काऊन्सिल अजूनही स्पर्धेबाबत साशंक आहे का अशी चर्चा रंगत असतानाच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

 

IPL 2020 स्पर्धेतील वेळापत्रकाबाबत टीओआयने दिलेल्या माहितीनुसार, सामन्यांचे वेळापत्रक हे कधीही बदलता येईल अशा स्वरूपाचे असायला हवे असा विचार BCCI करत असल्याचे सूत्रांनी सांगितलं आहे. BCCIने मागच्या वर्षी अर्धे वेळापत्रक हंगामाच्या मध्यात पुनर्नियोजित केलं होतं. पण यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या उपलब्धतेचा विचार करून वेळापत्रक बदल करण्याजोगे (flexible) अशा स्वरूपाचे ठेवण्यात आले आहे, कारण या दोन संघांचे खेळाडू स्पर्धेच्या दुसऱ्या आठवड्यापासून संघांमध्ये दाखल होणार आहेत. त्यामुळे स्पर्धेच्या पहिल्या तीन-चार दिवसात जे संघ या दोन संघांतील खेळाडूंवर फारसे अवलंबून नाहीत अशा संघांमध्ये सामने खेळवण्यात येण्याची शक्यता आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.

जर त्या पद्धतीने वेळापत्रक नियोजित करण्यात आलं तर पहिल्या सहा दिवसांमध्ये त्या संघांचे सामने होण्याची शक्यता खूपच कमी आहे. पण स्पर्धा मात्र सुरू होईल. त्यामुळे वेळापत्रक ठरवताना त्यात गरजेनुसार आयत्या वेळी बदल करता यावेत अशा सध्या IPL व्यवस्थापनाची मानसिकता असल्याचे सांगितले जात आहे.