Mumbai Indians share video as they exit IPL: इंडियन प्रीमियर लीगच्या १६ व्या हंगामाचा अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत, ज्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. दरम्यान, मुंबई इंडियन्सकडून सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये सर्व खेळाडू मायदेशी परतण्याच्या तयारीत उदास दिसत आहेत.
पाच वेळा आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सला दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सकडून पराभवाचा सामना करावा लागला. या विजयासह जीटीने सलग दुसऱ्यांदा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. शनिवारी, एमआय फ्रँचायझीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ड्रेसिंग रूमचा एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये सर्व खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे निराश दिसत होते. त्याचवेळी सर्व खेळाडू एकमेकांना मिठी मारत भावूक झाले. स्पर्धेची आठवण म्हणून खेळाडूंनी एकमेकांच्या बॅट आणि जर्सीवर स्वाक्षरीही केली.
आयपीएल २०२३ मधील मुंबई इंडियन्सच्या कामगिरीवर एक नजर –
या मोसमात मुंबई इंडियन्सच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले, तर त्यांनी साखळी टप्प्यातील १४ पैकी ८ सामने जिंकले आणि १६ गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश केला. त्यानंतर प्लेऑफ फेरीत, संघाने एलिमिनेटरमध्ये लखनऊ सुपर जायंट्सला पराभूत केले, परंतु क्वालिफायर दोनमध्ये गुजरात टायटन्सकडून ६२ धावांनी पराभव झाला. या हंगामात संघाचे फलंदाज विशेषत: सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, कॅमेरून ग्रीन आणि टीम डेव्हिड यांनी संघाला अनेक वेळा संकटातून बाहेर काढत विजय मिळवून दिला.
त्याचबरोबर मुंबई इंडियन्स संघाच्या गोलंदाजांनी काही सामन्यात शानदार गोलंदाजी केली. आकाश मधवालने गेल्या काही सामन्यांमध्ये गोलंदाजीत आश्चर्यकारक कामगिरी केली. पियुष चावलाने फिरकीची धुरा सांभाळत २२ बळी घेतले. सहा वर्षांनंतर (२०१७ नंतर) संघ प्लेऑफमध्ये पराभूत झाला. २०१७ मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्ध शेवटचा पराभव झाला होता.