रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १८ वर्षांनंतर विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव केला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना ९ विकेट गमावून १९० धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्ज २० षटकांत ७ विकेट गमावून फक्त १८४ धावाच करू शकले. विजयानंतर विराट कोहली भावुक झाला.
अखेरच्या षटकातील पहिले दोन चेंडू झाल्यानंतरच संघाचा विजय निश्चित असल्याचे स्पष्ट झालं होतं. विराट कोहलीने संघ पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकणार हे कळताच त्याचे डोळे पाणावले होते आणि मैदानावरच विराट भावुक झाला होता. अखेरचा चेंडू झाल्यानंतर विराट लहान मुलांसारखा गुडघ्यावर बसला आणि मैदानावर डोकं टेकवून रडू लागला.
विराटने यानंतर संघातील खेळाडूंची भेट घेत त्यांना मिठी मारत विजयाचा आनंद साजरा केला. विराटने यानंतर एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल यांनाही मिठी मारत विजयाचा आनंद साजरा केला. यानंतर अनुष्काला पाहताच विराट तिच्या दिशेने धावत गेला आणि तिला मिठी मारून पुन्हा भावुक झाला. यानंतर विराटने अनुष्काच्या कपाळावर किस देत आनंद साजरा केला. या क्षणाचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
विराट कोहलीने सामन्यानंतर सांगितलं की, अनुष्का ही मूळची बंगळुरूची आहे आणि त्यामुळेही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएल ट्रॉफी जिंकणं महत्त्वाचं होतं. दरम्यान विराट मैदानावर आनंदाश्रूंसह सेलिब्रेट करत होता तर तिथे अनुष्काही भावुक झाली होती. याशिवाय ती लहान मुलांप्रमाणे उड्या मारत आनंद साजरा करत होती. आरसीबीने १८ वर्षांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. हा प्रसंग पाहण्यासाठी आरसीबीच्या महिला संघाची कर्णधार स्मृती मानधनाही अहमदाबादमध्ये उपस्थित होती.