Rohit Sharma Emotional Video, T20 World Cup 2024: भारतीय क्रिकेट चाहते २९ जून हा दिवस कोणीच विसरू शकत नाही. या दिवशी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत जेतेपदाचा मान मिळवला होता. यासह १७ वर्षांची प्रतीक्षा संपवत भारताने दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली होती. या विजयाला वर्षपूर्ती झाली आहे. या विजयाची आठवण म्हणून रोहित शर्माने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर भावूक व्हिडीओ शेअर केला आहे.
हा विजय भारतीय संघासाठी अतिशय खास होता. कारण,भारतीय संघाने पहिल्यांदाच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना आयसीसीची ट्रॉफी जिंकली होती. १३ वर्ष भारतीय संघाला आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकता आली नव्हती. हा विजय भारतीय क्रिकेट चाहत्यांचे अश्रू पुसणारा होता. भारतात झालेल्या आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवानंतर, क्रिकेट चाहत्यांचं हृदय तुटलं होतं. पण टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील विजय हा भारतीय क्रिकेट चाहत्यांना दिलासा देणारा होता.
रोहित शर्माने शेअर केला भावूक व्हिडीओ
रोहित शर्माने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकपच्या विजयानंतरच्या आठवणी आहेत. खेळाडू टी-२० वर्ल्डकपच्या ट्रॉफीसोबत जल्लोष करताना दिसून येत आहेत. काही खेळाडू डान्स करताना दिसून येत आहेत. रोहितच्याही डोळ्यात पाणी आहे, तो हार्दिक पांड्याला मिठी मारताना दिसून येत आहे. रोहितने या व्हिडीओला ऑन दिस डे असं कॅप्शन दिलं आहे. हा सामना रोहित शर्मासाठी आणखी खास ठरण्याचं कारण म्हणजे, टी-२० वर्ल्डकप स्पर्धेची फायनल होताच रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता. रोहितसह विराटनेही टी-२० क्रिकेटला अलविदा केलं. त्यामुळे रोहितला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून आज १ वर्ष पूर्ण झालं आहे.
रोहित शर्माची कर्णधार म्हणून आयसीसीची पहिली ट्रॉफी
आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा विजय हा रोहित शर्मासाठी अतिशय खास ठरला. कारण त्याने कर्णधार म्हणून आयसीसीची पहिलीच ट्रॉफी जिंकली. त्याची ही कर्णधार म्हणून पहिली ट्रॉफी, तर खेळाडू म्हणून चौथी ट्रॉफी ठरली. भारतीय संघाने २००७ मध्ये जेव्हा आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेची ट्रॉफी जिंकली होती.
त्यावेळी एमएस धोनी भारतीय संघाचा कर्णधार होता. या विजयात रोहितनेही मोलाची भूमिका बजावली होती. त्यानंतर २०१३ मध्ये त्याने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही भारतीय संघाने विजय मिळवला होता. या विजयातही रोहितने मोलाची भूमिका बजावली होती. त्यानंतर २०२४ मध्ये झालेला टी-२० वर्ल्डकप आणि २०२५ मध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत रोहितच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने विजयाची नोंद केली.