Rohit Sharma Cheteshwar Pujara Incident 2012: गेल्या काही वर्षांपासून रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांचे मैदानावर आणि मैदानाबाहेरील बॉन्डिंग खूपच कमालीचं राहिलं आहे. भारताच्या कसोटी संघातील स्लिपमधील स्पेशालिस्ट फिल्डर्समध्ये रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे त्रिकुट असायचं. रोहित शर्माने कसोटीमधून निवृत्ती दिली आहे. तर पुजाराची भारताच्या कसोटी संघात निवड होत नाही. यादरम्यान एका खास कार्यक्रमात पुजाराने रोहितबद्दलचा एक किस्सा सांगितला.
गुरुवारी मुंबईत पुजाराची पत्नी पूजा पाबरी हिने लिहिलेल्या ‘द डायरी ऑफ अ क्रिकेटर्स वाईफ’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये अनिल कुंबळे आणि रोहितनेही पत्नी रितिकासह हजेरी लावली होती. यादरम्यान २०१२ मध्ये इंडिया अ संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर असताना घडलेला एक किस्सा सांगितला.
रोहितने पुजाराला विचारलं, “मला खात्री आहे की हे पुस्तकात लिहिलेलं नसावं. २०१२ मधील वेस्ट इंडिजच्या भारत अ संघाच्या दौऱ्याबद्दल काही आहे का? काय झालं होतं वगैरे?” पुजारा उत्तर देत म्हणाला, “मी सांगितलं नाहीये. म्हणजे, तिला माहिती आहे, पण तिला सविस्तर काही माहित नाहिये.”
पुजारा त्या घटनेची आठवण करून देताना म्हणाला, “मी शाकाहारी आहे. त्यामुळे आम्ही रात्री शाकाहारी जेवण शोधत होतो. आम्ही त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये होतो जिथे आम्ही रात्री ११ वाजता बाहेर गेलो होतो. आम्हाला जेवण काही मिळालं नाही, पण जेव्हा आम्ही परत येत होतो तेव्हा काही चोरांनी मला लुटलं. मी तुम्हाला त्याबद्दल सविस्तर सांगू शकत नाही, पण तो ज्याचा उल्लेख करत आहे ती हीच घटना आहे.”
रोहित यानंतर पुढे म्हणाला, “याचं तात्पर्य काय की हा हट्टी आहे. आम्ही त्याला सांगितलं होतं, त्याला रात्री बाहेर जाऊ नको अशी ताकीद दिली. रात्री ९ नंतर अजिबात बाहेर पडू नको. हे वेस्ट इंडिज आहे.”
रोहितने यादरम्यान अंडर एज क्रिकेट खेळताना पुजाराला बाद करण्यासाठी संघ किती तयारी करायचा हेही सांगायचा. रोहित आणि त्याचे सहकारी त्यांचा बहुतेक वेळ सौराष्ट्राच्या पुजाराला कसं बाद करायचं याचे नियोजन करण्यात घालवत होते, जो जवळजवळ एक दशक भारताच्या कसोटी संघाचा कणा बनला. “मला अजूनही आठवतंय, संघाच्या मिटिंग फक्त याला कसं आऊट करायचं यावरच होत असत आणि जर आपण त्याला बाद केलं नाही तर कदाचित आपण सामना गमावू,” रोहित म्हणाला.

सौराष्ट्रविरूद्ध सामना खेळून आल्यानंतर रोहित शर्माची अवस्था पाहून त्याची आईदेखील चिंतेत यायची. याबद्दल सांगताना रोहित म्हणाला, “मला आता आठवतंय की जेव्हा मी १४ वर्षांचा होतो तेव्हा मैदानावर जायचो आणि संध्याकाळी परत येताना माझ्या चेहऱ्याचा रंग पूर्णपणे वेगळा असायचा. कारण हा (पुजारा) दिवसभर फलंदाजी करायचा आणि आम्ही २-३ दिवस उन्हात क्षेत्ररक्षण करायचो. माझ्या आईने मला दोन वेळा विचारलं होतं की जेव्हा तू घरून खेळायला जातोस तेव्हा तू वेगळा दिसतोस आणि जेव्हा तू घरी येतोस तेव्हा आठवडाभर किंवा १० दिवसांनी तू वेगळा दिसतोस.”
आईच्या या प्रश्नावर उत्तर देताना रोहित म्हणाला होता, “मी आईला म्हणायचो, ‘आई, मी काय करू? चेतेश्वर पुजारा नावाचा एक फलंदाज आहे. तो तीन दिवसांपासून फलंदाजी करतोय…’ म्हणजे त्याची पहिली ओळख ही अशीच झाली होती.”