या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आयसीसी टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी आत्तापासूनच सर्व संघानी मोर्चेबांधणीला सुरुवात केली. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी संघाची यादी सादर करण्यासाठी आयसीसीने १६ सप्टेंबर हा शेवटचा दिवस दिला आहे. असे असले तरी अद्याप कोणत्याही देशांने आपला संघ जाहीर केलेला नाहीत. दरम्यान, भारतीय संघाची निवड कोणत्या दिवशी होणार याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

इनसाइडस्पोर्टने दिलेल्या वृत्तानुसार, टी २० विश्वचषकासाठी १५ सप्टेंबर रोजी भारतीय संघाची घोषणा होऊ शकते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) मुंबई येथील कार्यालयात याबाबत महत्त्वाची बैठक पार पडेल. संघाची निवड करण्यासाठी चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय निवड समिती विचारविनिमय करत आहे.

हेही वाचा – IND vs ZIM 2nd ODI: भारताला मालिकेत विजयी आघाडी; दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेचा पाच गडी राखून पराभव

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) घालून दिलेल्या नियमांनुसार, प्रत्येक संघात १५ खेळाडूंची निवड करता येईल. प्रत्येक देशाच्या चमूमध्ये कमाल ३० सदस्य (खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ) ठेवण्यास परवानगी आहे. असे असले तरी एका सामन्यासाठी केवळ २३ जणांचा चमू मैदानावरती उपस्थित राहू शकतो. यामध्ये १५ खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील आठ जणांचा समावेश असणे आवश्यक आहे.

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी २० विश्वचषकाची सुरुवात १६ ऑक्टोबरपासून होणार आहे. प्रथम पात्रता फेरी आणि त्यानंतर २२ ऑक्टोबरपासून मुख्य स्पर्धेतील सामने होतील. मागील विश्वचषकाप्रमाणे यावेळीही भारतीय संघाचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध आहे. २३ ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होईल.

हेही वाचा – Asia Cup 2022: शाहीन आफ्रिदी आशिया चषकातून बाहेर; क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर उडवली पाकिस्तानची खिल्ली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, टी २० विश्वचषकापूर्वी भारतीय संघ २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत भाग घेणार आहे. यानंतर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ भारत दौऱ्यावरती येणार आहेत. २००७ मध्ये भारताने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टी २० विश्वचषक स्पर्धेची पहिली आवृत्ती जिंकली होती. त्यानंतर मात्र, भारताला टी २० विश्वचषक जिंकता आलेला नाही. त्यामुळे यावर्षी १५ वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल.