England Player Slams Team India Ahead Of T20 World Cup: अगदी शेवटच्या क्षणी रिकाम्या हाताने परतण्याचा भूतकाळ मागे सोडून आता टीम इंडिया पुन्हा एकदा आयसीसी विश्वचषकात आपलं नशीब व कसब आजमावण्यासाठी सज्जी झाली आहे. यूएसए व वेस्ट इंडिज यांनी आयोजित केलेल्या आयसीसी टी २० विश्वचषकाला १ जून पासून सुरुवात होणार आहे. भारत यापूर्वी २००७ मध्ये टी २० विश्वविजेता झाला होता. मध्यंतरी अनेकदा प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही भारताला विश्वचषक उचलण्याची संधी मिळालीच नाही. २०२१ मध्ये लीग सामन्यात व २०२२ मध्ये सेमीफायनलपर्यंत पोहोचून टीम इंडिया रिकाम्या हाती परतली. त्यानंतर आता १७ वर्षांनी पुन्हा भारताला तीच कमाल करून दाखवता येणार का याकडे जगाचे लक्ष लागले आहे. अशातच आता इंग्लंडच्या प्रसिद्ध माजी खेळाडूने भारतीय संघावर कडवी टीका करून १५ सदस्यांच्या टीम इंडियासह १४० कोटी भारतीयांना सुद्धा डिवचलं आहे.

इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉयडने टॉकस्पोर्टशी बोलताना टी २० विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघावर जहरी टीका केली भारताचा संघा हा फारच प्रेडिक्टेबल आहे व त्यांच्याकडून कोणताही धोका नाही असं म्हणत लॉयडने टीम इंडियाला खाली दाखवण्याचा प्रयत्न केला. लॉयड म्हणाला होता की, ” तो (टीम इंडिया) एक असा संघ आहे ज्यांच्या खेळाचा अंदाज लावता येईल. त्यांच्यामुळे कोणाला बंधन येईल असं नाही. मला वाटतं विरोधी संघ सुद्धा त्यांच्या खेळाडूंची गुणवत्ता मान्य करतील, अर्थात टीम इंडियातील खेळाडू उत्तम आहेतच. पण ते फलंदाजी किंवा गोलंदाजीमध्ये कोणतीही रिस्क घेत नाहीत. त्यामुळे त्यांना त्यांचा एखादा गौरवाचा क्षण या सामन्यांमध्ये कदाचित गवसेल पण ते काही मोठा धोका नसतील.”

आपल्या माहितीसाठी, भारत १ जून रोजी यूएसएमध्ये बांगलादेश विरुद्ध सराव सामन्याने तयारीला सुरुवात कारणात आहे. या सामन्याचे ठिकाण आणि वेळ अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. आयसीसीने २७ मे ते १ जून या कालावधीत यूएसए, त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये सराव सामने आयोजित केले आहेत, ज्यामध्ये २० पैकी १७ सहभागी संघांचा समावेश आहे.या सामन्यांना T20I दर्जा नसेल, ज्यामुळे संघांना त्यांच्या १५ खेळाडूंच्या संघातील सर्व सदस्यांना मैदानात उतरवता येईल. संघ त्यांच्या वेळापत्रकानुसार दोन सराव सामने खेळू शकतात.

हे ही वाचा<< “तो स्वार्थीपणे खेळतोय..”, अश्विनने संजु सॅमसनची विश्वचषकाच्या संघात निवड होताच केलं मोठं विधान; म्हणाला,”त्याची गरज..”

टी २० विश्वचषकाचा भारतीय संघ कसा आहे?

रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान.