विविध प्रकारच्या वीजप्रकल्पांसाठी ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात आता प्रदुषणमुक्त १४५ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. भद्रावती तालुक्यातील करचराळा येथे हा प्रकल्प होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ऊर्जामंत्री नितीन राउत यांनी याला हिरवा झेंडा दाखवला आहे. चंद्रपूर जिल्ह्याने कायमच उद्योग, औष्णिक विद्युत प्रकल्प यासाठी जगाच्या नकाशावर स्थान मिळविले आहे. मात्र, यामुळे येथे मोठ्या प्रमाणात प्रदुषणाच्या प्रश्नही निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील प्रदूषणामुळे लोकांच्या आरोग्यावर होणार परिणाम नेहमीच चिंतेचा विषय ठरत आहे. जिल्ह्याातील नवीन औष्णिक ऊर्जा प्रकल्प येऊन जिल्हातील वनसंपदेच्या ऱ्हास होणार होता. मात्र, हे टाळण्यासाठी खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्ह्याात पर्यावरणाचे संतुलन राखले जाईल असे उद्योग आणण्याची आग्रही भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या पुढे मांडली होती. त्यांच्या या मागणीवर सकारात्मक निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांनी १४५ मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्पाला मान्यता दिली. या ग्रीन प्रोजेक्टमुळे प्रदूषणविरहित वीज निर्मिती करून चंद्रपूर जिल्हातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पामुळे रोजगार निर्मिती चालना मिळून स्थानिकांना रोजगाराची संधी देखील उपलब्ध होणार आहे, असं खासदार धानोरकर यांनी सांगितलं.