साहित्य अकादमी प्राप्त कवी ऐश्वर्य पाटेकर यांना दिल्ली येथे होणाऱ्या ‘भारतीय कविता : नई फसल’ या काव्यमहोत्सवात कविता वाचनाकरिता निमंत्रित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २१ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथील मेघदूत थिएटरमध्ये होणार आहे.साहित्य अकादमीतर्फे आयोजित या कार्यक्रमात हिंदी, इंग्रजी, ओडिशी, बांगला, संस्कृत, कन्नड, उर्दू नेपाळी, संताली आणि मराठी या दहा भारतीय भाषांतील पंधरा कवी सहभागी होणार आहेत. उद्घाटन प्रख्यात हिंदी कवी अरुण कमल यांच्या हस्ते होणार आहे. मंगलेश डबराल, लीलाधर जगुडी, आशीष त्रिपाठी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात पाटेकर मातृभाषेत एक कविता आणि चार कवितांचे हिंदी अनुवाद सादर करणार आहेत. नाशिक येथील क. का. वाघ शिक्षण संस्थेत व्याख्याता पदावर कार्यरत असलेल्या पाटेकर यांना मागील वर्षीही अकादमीतर्फे ‘इंडियन पोएट्री फेस्टिव्हल’मध्ये आमंत्रित करण्यात आले होते. देशाच्या राजधानीत काव्यवाचनाचा मान अशा प्रकारे त्यांना दुसऱ्यांदा मिळत आहे.