करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून मंदिरांसह सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळे बंद ठेवली जात आहेत. असं असताना राज्याच्या मंत्र्यांनीच चक्क मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करत आरती केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड हे रविवारी खासगी दौऱ्यानिमित्त नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी आनंदवली येथील नवश्या गणपती मंदिरात हजेरी लावून आरती केली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केला म्हणून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहेत. यावर दिल्ली दौऱ्यावर असलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. मंत्र्यानी कोविड नियमांच उलंघ्घन करणं योग्य आहे का, यावर अशोक चव्हाण म्हणाले, राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळे निर्बंध आहेत. नाशिकमध्ये निर्बंध तेथील प्रशासनाने शिथिल केले असतील तर दर्शन घ्यायला काही हरकत नाही." पुढे याबाबत माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नाला उत्तर देण्याचे चव्हाण यांनी टाळले. ५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल यातच नियम मोडल्याप्रकरणी ५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला गेला आहे. नाशिक पोलिस आयुक्तांनी मंत्र्याना अभय देत केवळ कार्यकर्त्यांवर कारवाई केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मंत्र्यांसाठी वेगळा आणि सामान्य जनतेसाठी वेगळा कायदा आहे का हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. भाविकांकडून याप्रकरणी प्रश्न उपस्थित केल्यानंतर पोलीस यंत्रणा जागी झाली झाली. मात्र, जितेंद्र आव्हाड यांना वगळून अन्य पाच जणांविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये योगेश नामदेव दराडे , स्वप्नील प्रभाकर चिंचोले , विक्रांत उल्हास सांगळे, संतोष पांडुरंग काकडे, आनंद बाळिवा घुगे या पाच कार्यकत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यांवर मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग, भादंवि कलम १८८६, २६९ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.