बोरिवलीमधील रिक्षावाले, फेरीवाले, मोची, किरकोळ व्यावसायिक, सामान्य नागरिक यांनी आपापल्या कुवतीनुसार १० रुपये, ५० रुपये, १०० रुपये देऊन जमा केलेला निधी म्हणजे महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला मदतीचा हात आहे. मग ती रक्कम खासदार संभाजीराजे यांना भीक का वाटावी ? असा प्रश्न विनोद तावडे यांनी विचारला आहे. काही दिवसांपुर्वी भाजपा नेते आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी रस्त्यावर लोकांकडे पैसे मागत मदत गोळा केली होती. यावर टीका करताना छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भिकेची गरज नाही असा संताप व्यक्त केला होता.

“आपत्तीच्या वेळी कोल्हापूर, सांगली आणि कोकणातील आपल्या बंधू भगिनींना मदत करण्याची सर्वसाधारण माणसाला इच्छा होती आणि त्यासाठी मंत्री असूनही मतदारसंघात फिरून यासर्वांचं प्रेम, त्यांनी देऊ केलेली मदत एकत्र करून पूरग्रस्तांसाठी पाठवली, तर याला भीक का म्हणावे? हा प्रश्न ही मदत देणार्‍या प्रत्येक माणसाला पडला आहे आणि म्हणूनच पूरग्रस्तांसाठी मदत पाठविलेल्या जनतेच्या भावनांचा अनादर होत आहे”, असं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.

“स्वाभिमानी कोल्हापूरकरांना भिकेची गरज नाही”, संभाजीराजे विनोद तावडेंवर संतापले

“राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या या मदतफेरीचे राजकीय द्वेषापोटी विडंबन केले, हे राजकारण म्हणून मी समजू शकतो. कारण, त्यांच्याकडे आता बाकी कोणतेही मुद्दे राहिले नाहीत आणि एका विधानसभेतून पहिल्यांदाच इतका मोठ्या प्रमाणात मदतनिधी जमा होतो, हे त्यांना पहावले नसेल. पण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या राजकीय प्रचाराला संभाजीराजे यांनी बळी पडावे, याचे मला दुःख असल्याचं”, विनोद तावडे यांनी सांगितलं आहे.

“आमच्यासारख्या शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी अडचणीत असलेल्या जनतेला आधार दिला, गोरगरिबांचे प्रेम जमा करून पूरग्रस्तांसाठी पाठविले, याचे संभाजीराजे यांनी खरेतर कौतुक करायला हवे होते. पण त्याची अवहेलना केली”, अशी खंत विनोद तावडे यांनी व्यक्त केली आहे.

काय म्हणाले होते संभाजीराजे भोसले ?
छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी यांनी टीका करताना म्हटलं होतं की, “स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भिकेची गरज नाही. महाराष्ट्राच्या मंत्र्याला भीक मागण्याची वेळ यावी? ह्यापेक्षा दुर्दैव ते काय? मी हा व्हिडीओ आत्ताच पाहिला, इथे भीक स्वीकारली जाणार नाही. पुरग्रस्तांची क्रूर चेष्टा सहन केली जाणार नाही. सर्वसामान्य महाराष्ट्रवासीयांचे प्रेम, कोल्हापूर, सांगलीकरांनी मनापासून स्वीकारलं आहे”.