उत्तर भारतीयांचा मोठा उत्सव असलेल्या छट पूजेबाबतही राज्य शासनाने इतर सणांप्रमाणेच काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. छटपूजेसाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे.

याबाबत जनतेला आवाहन करताना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, “छटपूजेसाठी आम्ही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, समुद्र किनाऱ्यांवर, नदी किनाऱ्यांवर आणि तालावांच्या काठी पूजा करता येणार नाही. आमचं जनतेला आवाहन आहे की त्यांनी या सूचनांच पालन करावं. करोनाचा संसर्ग आटोक्यात ठेवण्यासाठी हे महत्वाचं आहे.”

राज्यात विशेषतः मुंबईत मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतातील स्थलांतरीत नागरिक वास्तव्याला आहेत. त्यामुळे मुंबईत समुद्र किनारी मोठ्या प्रमाणावर हा उत्सव साजरा केला जातो.  त्यानुसार नागरिकांना पुढील प्रमाणे सूचना करण्यात आल्या आहेत.

१) करोनामुळे समुद्रकिनारी गर्दी न करता घरीच राहून उत्सव साजरा करावा.
२) पूजेसाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात यावी.
३) कुठल्याही प्रकारच्या प्रदुषणात वाढ होऊ नये म्हणून फटाके, आतिषबाजी, ध्वनिक्षेपक यांना बंदी असेल.
४) मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळणे हे नियम कटाक्षाने पाळणे आवश्यक.