कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांचा प्रवास सुखकर व्हावा, म्हणून  रेल्वे प्रशासनाकडून १६६ विशेष गाडय़ा चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई, टिळक नगर, दादर, पुणे, करमाली, सावंतवाडी, रत्नागिरी आणि पेरनेम या स्थानकांसाठी या विशेष गाडय़ा चालविण्यात येणार असून या गाडय़ांचे तिकीट आरक्षण २५ मेपासून खुले करण्यात आले होते. परंतु पहिल्याच दिवशी तिकिटे संपली आणि विशेष गाडय़ांची प्रतीक्षा यादी ३०० वर पोहोचली आहे. पण येत्या काही दिवसांत गणेशोत्सवासाठी विशेष गाडय़ांची संख्या वाढवण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

२ सप्टेंबरला गणेशाचे आगमन होण्याच्या पाश्र्वभूमीवर मध्य रेल्वेने तीन महिने आधी १७ मे रोजी गणेशोत्सवासाठी १६६ विशेष फे ऱ्यांची घोषणा केली होती. मात्र आरक्षणाच्या पहिल्याच दिवशी या गाडय़ांची तिकिटे संपल्याचे आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून दिसून आल्याने प्रवासी चिंतेत पडले आहेत. दरम्यान, ३१ ऑगस्ट, १ सप्टेंबर, २ सप्टेंबर या दिवशी मुंबई ते सावंतवाडी आणि मुंबई-रत्नागिरी-पनवेल, पनवेल-सावंतवाडी या विशेष गाडय़ांची प्रतीक्षा यादी २०० च्या आसपास गेली आहे.

विशेष म्हणजे मुंबई-कोकणमार्गावरील महत्त्वाची असलेली कोकणकन्या एक्स्प्रेस ७ सप्टेंबपर्यंत आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड डबलडेकर ४ सप्टेंबपर्यंत पूर्ण भरली आहे.