“नागरिकांनी सुरक्षित ठिकाणीच रहावे. सरकार व प्रशासन आपली सर्वतोपरी काळजी घेत आहे. सर्वांनी आपली काळजी घ्यावी आणि सुरक्षित राहावं,” असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

“अरबी समुद्रात तयार झालेलं निसर्ग हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर येत आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील नागरिकांनी कृपया घरातून बाहेर पडू नये. घाबरुन न जाता सरकारकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करावे,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

आणखी वाचा- “राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चक्रीवादळात प्रशासनासोबत मदतीला उभे रहावे”

शरद पवारांकडून कार्यकर्त्यांना मदतीचं आवाहन

निसर्ग चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला धोका निर्माण झाला असून प्रशासनासोबत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उभे रहावे असे, निर्देश राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत.

मंगळवारपासूनच संपूर्ण कोकण किनारपट्टीवर ‘निसर्ग’ चक्रीवादळ ९० ते १२० च्या वेगाने घोंघावत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्हयांना या चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. या जिल्ह्यांना तडाखा बसला आहेच शिवाय मुंबई, ठाणे यांनाही फटका बसणार आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आणि होणार आहे. अशावेळी प्रशासन सतर्क राहून काम करत आहेच. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही प्रशासनासोबत मदतीला उतरण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.

वादळी वाऱ्यांचा तडाखा बसल्याने सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या लोकांना तात्काळ मदतीचा हात द्यायला हवा, असेही शरद पवार यांनी सांगितले आहे.