राफेल विमानाची किंमत 500 कोटीहून 1600 कोटीवर नेली. असा आरोप करीत राफेलचे हे भूत भाजपा सरकारला गाडल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीआरपी-रिपाई (गवई) गट, शेकाप व सीपीएमसह मित्र पक्षाच्या महाआघाडीची विराट संयुक्त प्रचारसभा बुधवार दि. 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता गोकुळनगर येथील इंदिरा गांधी मैदानावर आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना खा.शरद पवार म्हणाले की, पुलवामा घटना ही देशावरचे संकट आहे. अशा संकटाच्यावेळी मतभेद विसरून आम्ही एकीचे दर्शन घडवतो असा लौकीक आहे. परंतु गृहमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत आम्ही सर्वजण पंतप्रधान नरेंद्र मोदी व बैठकीस उपस्थित न राहता धुळे, यवतमाळ येथे प्रचारसभेत गुंतले होते. नोटबंदी नंतर आतंकवादी हल्ले कमी होतील असा दावा करण्यात येत होता.
मात्र आंतकवादी हल्ल्यात वाढ झाली आहे. आंतकवादी घटनेनंतर काँग्रेस सरकारने समर्थपणे परिस्थिती हाताळली. लालबहाद्दूर शास्त्री पंतप्रधान असताना त्यांनी पाकिस्तानला धडा शिकवला. तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी इतिहासच नाही तर पाकिस्तानचा भुगोलही बदलला. भाजपा सरकारच्या नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था प्रभावित झाली. गरीबांचे जीवन उद्ध्वस्त झाले. जीएसटीमुळे व्यापारी अडचणीत आला आहे. या सरकारच्या कार्यकाळात आरबीआय, सीबीआय सह प्रमुख संस्थात सरकारचा हस्तक्षेप वाढला आहे. या प्रमुख संस्था मोडीत काढण्याचे पाप भाजप सरकार करीत आहे. धनगर समाजास आरक्षण देण्याचे आश्वासन भाजपाने दिले होते मात्र अद्यापही आश्वासनाची पूर्तता केली नाही. भाजपाचे आश्वासन म्हणजे लबाडाचं अवतान जेवल्याशिवाय खरं नाही असे म्हणत खा.शरद पवार यांनी मोदी सरकारवर घणाघाती प्रहार केला.
व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, काँग्रेसचे सहप्रभारी संपत कुमार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पीआरपीचे जोगेंद्र कवाडे, माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री बस्वराज पाटील, माणिकराव ठाकरे, जयप्रकाश दांडेगावकर, शेकापचे जयंत पाटील, माजी मंत्री कमलकिशोर कदम, गंगाधरराव कुंटूरकर, आ.डी.पी.सावंत, आ.अमिताताई चव्हाण, आ.अमरनाथ राजुरकर, आ.वसंतराव चव्हाण, आ.प्रदीप नाईक, फौजीया खान, शंकरअण्णा धोंडगे, रामराव वडकुते, बापुसाहेब गोरठेकर, नरेंद्र चव्हाण सह महाआघाडीतील विविध पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती होती.