वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अहवालावरून देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली होती. शुक्ला यांच्या अहवालावर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर केल्यानंतर विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी पुन्हा लक्ष्य केलं होतं. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि जितेंद्र आव्हाड यांनी हा अहवाल तयार केल्याचं फडणवीस म्हणाले होते. फडणवीस यांच्या आरोपांना राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिलं आहे.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. “पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा अहवाल नवाब मलिक यांनी सार्वजनिक केला, असं देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. मात्र, ते स्वतः रश्मी शुक्लांच्या पत्राचा आधारावर दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन सरकारवर आरोप करत होते. मुंबईतही पत्रकार परिषद घेतली आणि बदल्यांमध्ये पैसे खाल्ले असे आरोप करत होते. केंद्रीय गृह सचिवांना व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही ते भेटले. फडणवीसांचे आरोप चुकीचे असून या प्रकरणी आता गुन्हा दाखल झाल्याने जवळचे व्यक्ती अडचणीत येतील म्हणून देवेंद्र फडणवीस घाबरले”, असा आरोप मलिक यांनी केला आहे.

“मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांनी सांगितलेला रश्मी शुक्लांचा अहवाल काय आहे? बेकायदेशीर फोन टॅपिंग केले. रश्मी शुक्लांचा रिपोर्ट येईपर्यंत कुठल्याही अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या नव्हत्या. नंतरच्या काळात काही बदल्या झाल्या असं ते सांगत आहेत. त्यात १२ नावं आहेत. मात्र, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये बदल्या होत राहतात. पोलीस बोर्डाच्या अध्यक्षतेखाली या बदल्या होतात. पण फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचं काम केलंय,” अशी टीका मलिक यांनी केली.

“नवाब मलिक यांनी अहवाल फोडला असं फडणवीस सांगत आहेत, परंतु गुन्हा दाखल झाल्यावर का घाबरत आहेत?”चोरी झाली नाही अशी बोंबाबोंब फडणवीस करत आहेत. अफवा पसरवून लोकांना बदनाम करत आहेत. आम्ही सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न करत नाही. कारण आमचे सरकार खंबीरपणे उभे आहे. फडणवीस हे रश्मी शुक्ला यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कटकारस्थान आखत होते. त्या अहवालात काय आहे? ऑगस्टमध्ये हा अहवाल सादर झाला तेव्हा कुठलीही बदली झालेली नाही. फडणवीसांनी तो ६.३ जीबीचा डेटा दाखवावा. भाजपाला सत्तेशिवाय राहता येत नाही. भाजपाचे नेते आपल्या जवळच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरत कट रचत आहेत. तीन महिन्यात सरकार पडेल, आमदार फुटतील, अशा वल्गना केल्या त्याचं काय झाल? राष्ट्रपती राजवट लागेल अशी बोंबाबोंब करतात, पण तसं काही होणार नाही. सरकारवर लोकांचा विश्वास आहे,” असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला.