करोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी अवश्यक सॅनिटायझरचा बाजारामध्ये तुटवडा झाल्याने बनावट सॅनिटायझरची निर्मिती करुन फसवणूक केली जात असल्याची प्रकरणे उघडकीस येत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील येडेश्वरी साखर कारखान्यासह राज्यातील एकूण 37 कारखान्यांना सॅनिटायझर निर्मितीची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता दररोज दोन लाख लिटर सॅनिटायझरची निर्मिती होणार असून स्वस्तात व दर्जेदार उत्पादन बाजारात उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्रात करोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने मास्क आणि सॅनिटायझर वापरण्याच्या सूचना दिल्यानंतर एकदम मागणी वाढल्याने बाजारात सॅनिटायझरचा तुटवडा निर्माण झाला. महामारीच्या साथरोगातही बनावट दर्जाहीन सॅनिटायझर बाजारात आणून फसवणूक करण्याचे उद्योग उघडकीस आले. बाजारातील मागणी आणि उत्पादन यातील तफावत लक्षात घेता सरकारने महाराष्ट्रात अल्कोहोल निर्मिती करणाऱ्या साखर कारखान्यांना सॅनिटायझर निर्मिती करण्याचे आवाहन केले. यानंतर अल्कोहल निर्मीती करणाऱ्या 80 साखर कारखान्यांनी सकारात्मकता दाखवली त्यानुसार (३७) 37 कारखान्यांना परवानगीही देण्यात आली आहे. यामुळे आता साखर कारखान्यातून दररोज दोन लाख लिटर सॅनिटायझरची निर्मिती होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सॅनिटायझर बनवण्यासाठी 70 टक्के अल्कोहोल, ग्लिसरीन आणि वॉटर कलरचा वापर केला जातो. त्यामुळे साखर कारखान्यातून तयार होणारे सॅनिटायझर हे इतर ठिकाणीच्या उत्पादनापेक्षा दर्जेदार आणि स्वस्त असणार असल्याने लुट, फसवणूक होणार नाही. हे सॅनिटायझर कारखान्यातून 100 मिली लिटरपासून ते एक लिटर पर्यंतच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध होणार आहे. सध्या कोल्हापूर साखर कारखाना, पुण्यातील लोकरंजन प्रकल्प, सांगलीच्या वसंतदादा पाटील शुगर आणि राजाराम बापू साखर कारखान्यातून सॅनिटायझर उत्पादनास सुरुवात झाली आहे. तर येडेश्वरीसह परवानगी मिळालेल्या कारखान्यातून लवकरच निर्मिती सुरू होत आहे. त्यामुळे बाजारातील तुटवडा लवकरच संपेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आणखी वाचा- बाजारातून हँड सॅनिटायझर विकत घेताय? सावध राहा…. संकट काळात दर्जेदार आणि जास्तीत जास्त सॅनिटायझरचे उत्पादन करू - येडेश्वरी साखर कारखान्यास सॅनिटायझरचे उत्पादन करण्याची परवानगी मिळाली आहे. करोना विषाणूच्या संकट काळात दर्जेदार आणि जास्तीत जास्त सॅनिटायझरचे उत्पादन करून या कठीण काळात आपले योगदान देऊ, असे मत साखर कारखान्याचे अध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे यांनी व्यक्त केले आहे.