राज्यात सध्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपा या मुद्यावर आक्रमक झाली आहे. आज(शनिवार) भाजपा महिला मोर्चाच्यावतीने राज्यव्यापी आंदोलन केली जात आहेत. तसेच, याप्रकरणी महाविकासआघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची देखील मागणी भाजपाने केली असुन, यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अधिवेशन इशारा देखील दिला आहे. दरम्यान, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

“सरकार हे नेहमी पालकत्त्वाच्या भूमिकेत असले पाहिजे. आमची मागणी आहे की, केवळ दबावाचे, गळचेपीचे राजकारण न करता सरकारने आधी दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करावी. महिला सुरक्षेचे विषय तरी किमान राजकारणाच्या पलिकडे असले पाहिजे.” असं देवेंद्र फडणणीस यांनी महाविकासआघाडी सरकारला सुनावलं आहे.

तसेच, “सरकार दोषींवर कारवाई करीत नाही. पण, आंदोलन करणार्‍या महिलांचेच अटकसत्र राबविण्यात शासनाला धन्यता वाटते. भाजपाच्या महिला नेत्यांच्या छायाचित्रांशी छेडछाड करणार्‍या विकृतीवर कारवाईची तत्परता न दाखविता, केवळ आवाज दडपण्याच्या या दबावतंत्राचा आम्ही तीव्र निषेध करतो.” असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपानं पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून सरकारला आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेरण्याची पूर्ण तयारी केली असून, आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान दिलं आहे.

“उद्धवजींना मी इशारा देतो, की जर…”, पूजा चव्हाण प्रकरणी चंद्रकांत पाटलांचं मुख्यमंत्र्यांना जाहीर आव्हान!

“सोमवारपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. सोमवारच्या आत जर राज्य सरकारने संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही, त्यांची चौकशी सुरू केली नाही आणि मुख्यमंत्र्यांनी यावर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवदन करावं, नाहीतर आम्ही या मुद्द्यावर तोंड न उघडणाऱ्या राज्य सरकारला अधिवेशनात तोंड उघडू देणार नाही, सभागृह चालू देणार नाही”, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.