राहाता : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा सर्वाधिक वेळ परदेशात जात असल्याने, देशातील राजकीय परिस्थिती समजून घ्यायला त्यांना वेळ लागेल, असा टोला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी लगावत निवडणूक प्रक्रिये विरोधातील त्यांची विधाने म्हणजे मतदारांचा अपमान असल्याची प्रतिक्रिया त्यांनी आज शनिवारी लोणी येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विधानाचा समाचार घेताना मंत्री विखे म्हणाले की, केवळ निवडणूक प्रक्रियेला बदनाम करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मागील दोन लोकसभा निवडणुकीत काँगेस पक्ष जेमतेत चाळीस जागांपर्यंत मजल मारू शकला होता. यंदा चाळीसच्या शंभर झाल्या मग ते फिक्सिंग होते काॽ आंध्र आणि हिमाचल राज्यात तुमच्या पक्षाचे सरकार आले ते सुध्दा फिक्सिंगमुळे आले का, या प्रश्नांची उत्तरे सुध्दा राहुल गांधीनी दिली पाहिजेत. निवडणूक प्रक्रिये विरोधात विधान करून राहुल गांधी स्वत:ची बदनामी करून घेत आहेत. लोकसभेची निवडणूक खोटे नॅरेटिव्ह पसरवून केली गेली. काही ठिकाणी त्याचा परिणाम पाहायला मिळाला. विधानसभा निवडणुकीची राजकीय परिस्थिती मात्र वेगळी होती. महायुतीला राज्यातील मतदारांनी कौल दिला. मात्र मतदारांचा सातत्याने अपमान करण्याचे काम राहुल गांधी यांच्याकडून होत आहे. त्यांनी देशात वेळ दिला तर, राजकीय परिस्थितीची माहिती होईल.
उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत आणि खा.सुप्रिया सुळे यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याच्या केलेल्या समर्थनाची खिल्ली उडवून, विखे म्हणाले, त्यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरेल. खा.सुप्रिया सुळे यांना स्वत:चे कोणतेच मत राहिलेले नाही. लोकसभेत मांडण्यात आलेल्या विधेयकाला ते कधी पाठिंबा देतात, कधी चर्चेच्या वेळी गैरहजर राहतात. त्यांचे पिताश्री मोदीचे कौतुक करतात याकडे लक्ष वेधून त्यांनी खरंच एकदा निर्णय घेतला पाहिजे की, आघाडीसोबत राहायचे की मोदींच्या बरोबर काम करायचे. त्यांच्या पक्षातील लोकांचा सुध्दा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही.
उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्रित येण्याच्या मुद्द्यावर भाष्य करताना मंत्री विखे म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेच्या मनात फक्त महायुती आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही तेच चित्र पाहायला मिळेल, निवडणुका महायुती म्हणूनच आम्ही लढणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.