अहिल्यानगर : अपघाताचा बनाव करून तरुणाचा खून केल्याचा धक्कादायक गुन्हा अहिल्यानगर तालुका पोलिसांनी दाखल केला आहे. या संदर्भात दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या दोघांना न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. मृत तरुणाच्या प्रेमसंबंधातून हा खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

आदेश नंदू घोरपडे (वय २२, रा. कायनेटिक चौक, अहिल्यानगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे तर विश्वजीत सुभाष पोटे (वय २५) व संकेत बाळासाहेब बंडाले (२७, दोघे रा. दादेगाव, आष्टी, बीड) या दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी दिली. ही घटना ३० मे रोजी सायंकाळी टाकळी काझी (ता. अहिल्यानगर) येथील हॉटेल रायबा समोर घडली.

याबाबत मोहित निमसे यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली होती. सुरुवातीला पोलिसांनी अपघाताचा गुन्हा पिकअप चालकाविरुद्ध दाखल केला होता. मात्र मृत घोरपडेच्या आईने हा अपघात नसून, आपल्या मुलाचा खून झाल्याचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला होता. त्यामुळे पोलिसांनी अधिक सखोल चौकशी सुरू केली होती. त्यामध्ये खून झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आदेश घोरपडे याचे दादेगाव येथील एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र तिच्या कुटुंबीयांनी तिचा विवाह दुसऱ्या मुलासोबत ठरवला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याची माहिती घोरपडे याला मिळाल्यानंतर त्याने मोहित निमसे व इतर मित्रांसह दादेगाव येथे गेला. तेथे मुलीच्या नातेवाईकांशी त्याचा वाद झाला. या वादानंतर घोरपडे व निमसे दुचाकीवरून पळून गेले, त्याचे इतर मित्र मोटारीने निघाले. मुलीच्या नातेवाईकांनी पाठलाग सुरू केला. घोरपडे व निमसे हे टाकळी काझी शिवारातून जाताना पिकअप वाहनाने त्यांना धडक दिली. यामध्ये घोरपडे याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात नसून पूर्वनियोजित कट असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे सहायक निरीक्षक गीते यांनी सांगितले. दोघांना अटक केल्यानंतर या कटामध्ये चौघांचा समावेश असल्याची माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली.