सोलापूर : मागील मे महिन्यात सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच प्रचंड प्रमाणात झालेल्या पावसामुळे हजारो हेक्टर शेती क्षेत्राचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतीपिकांचे प्रशासकीय पातळीवर पंचनामे सुरू असताना दुसरीकडे अधिक नुकसान नसलेल्या शेतशिवारात संकट विसरून आणि उद्याची आस बाळगून खरीप हंगामात विविध पिकांची पेरणी सुरू झाली आहे. यात सोयाबीन, उडीद, तूर, मका, कापूस आदी पिकांचा समावेश आहे.
दरम्यान, गेल्या मे महिन्यात, १७ दिवस संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात तब्बल २३३ मिलीमीटर इतका जोरदार पाऊस झाला होता. त्यानंतर ३१ मेपासून पाच-सहा दिवस पाऊस थांबला होता. त्यानंतर मृग नक्षत्र सुरू झाला असता पुन्हा दोन दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. रविवारी दुसऱ्या दिवशी आणि सोमवारी तिसऱ्या दिवशी मात्र पहाटेपासून पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली. मात्र, हा पाऊस दक्षिण सोलापूर (२७.३ मिमी), अक्कलकोट (१९), मंगळवेढा (१६.७), मोहोळ (११.६) अशा ठरावीक भागात पडला. तर सोलापूर शहरासह उत्तर सोलापूर (८.८), बार्शी (५.२), सांगोला (४.९), पंढरपूर (२.९) या तालुक्यांत पावसाने तुरळक प्रमाणात हजेरी लावली. एरव्ही, पावसाचा जास्त जोर राहिलेल्या माळशिरस आणि करमाळा तालुक्यात पावसाने ओढ दिल्याचे दिसून आले.
या पार्श्वभूमीवर गेले सुमारे आठवडाभर पाऊस नसल्याने शेतशिवारात शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आणि खरीप पीक पेरण्यांची तयारी वेगाने सुरू झाली. जिल्ह्यातील खरीप हंगामात एकूण पेरणी क्षेत्र तीन लाख ७६ हजार ७२३ हेक्टर एवढे असून, त्यादृष्टीने पेरणीचे नियोजन करण्यात येत आहे. सध्या खरीप पिकांच्या पेरण्यांसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याचे मानले जात आहे.