Devendra Fadnavis On Mahayuti Cabinet Home Ministry : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला निर्विवाद बहुमत मिळालं असून गुरुवारी (५ डिसेंबर) देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर, एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यात सरकार स्थापन झालं असलं तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार बाकी आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे अनेकाचं लक्ष लागलं आहे. सध्या सर्व खाती ही एकट्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहेत. दुसरीकडे, भाजपा आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गृहमंत्री पदासाठी रस्सीखेच चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. या पदामुळेच शिंदेंचं नाराजीनाट्य देखील पाहायला मिळालं. तसेच त्यांनी सरकारमध्ये सहभागी न होण्याची भूमिका घेतली होती. मात्र, भाजपा पक्षश्रेष्ठीं व शिवसेना (शिंदे) आमदारांच्या दबावामुळे शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं.

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारत सरकारमध्ये सहभागी झाले असले तरी गृहमंत्रीपदाचा तिढा अद्याप कायम आहे. मागील १० पैकी ७.५ वर्षे गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांकडेच आहे आणि आताही ते या पदावरील दावा सोडण्याची शक्यता कमीच आहे. दरम्यान, गृहमंत्रीपदाबाबत देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांनी एकदाही जाहीरपणे भाष्य केलेलं नव्हतं. मात्र, आज तक या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. महायुतीच्या नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रीपद मागितलं आहे का? असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला होता. त्यावर फडणवीस म्हणाले, “नाही! त्यांनी असं कुठलंही मंत्रीपद मागितलेलं नाही. त्यांनी फक्त तीन ते चार खात्यांवर चर्चा व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आम्ही त्यावर चर्चा करून निर्णय घेऊ”.

हे ही वाचा >> शरद पवार व राहुल गांधी मारकडवाडीला जाणार, ईव्हीएमविरोधात लाँग मार्चची तयारी; आव्हाड म्हणाले, “हा क्रांतीचा एल्गार”

गृहमंत्रीपदाबाबत देवेंद्र फडणवीस व भाजपाची भूमिका काय?

फडणवीसांना विचारण्यात आलं की तुमची गेल्या १० वर्षांमधील कामाची पद्धत पाहता गृहमंत्रीपद तुम्ही स्वतःकडेच ठेवता असं पाहायला मिळालं आहे. तुम्ही उपमुख्यमंत्री असताना देखील गृहमंत्रीपद तुमच्याकडेच ठेवलं होतं. त्यामुळे तुम्ही गृहमंत्रीपद सोडणार नाही असं म्हटलं जातंय, त्याबद्दल काय सांगाल? यावर फडणवीस म्हणाले, “तसं बघायला गेलं तर गृहमंत्रीपद आमच्याकडेच राहिलं पाहिजे असं मला वाटतं. परंतु, तसा काही हट्ट नाही. आजवर हे खातं आमच्याकडे राहिलं आहे.

हे ही वाचा >> Maharashtra Breaking News Live : नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सुरू, ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांचे आमदार आज शपथ घेणार नाहीत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फडणवीस म्हणाले, “आम्ही तिघेही एकत्रच आहोत. मात्र, गृहमंत्रीपद सांभाळत असताना केंद्र सरकारशी, केंद्रीय गृह मंत्रालयाशी समन्वय ठेवावा लागतो. या राज्यात नक्षलवादाची समस्या आहे. मुंबईसारखं मोठे शहर सांभाळायचं आहे. हे शहराची परिस्थिती खूप नाजूकपणे हाताळावी लागते. ही एक प्रकारे देशाची राजधानी आहे. माझा भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाशी नेहमी संपर्क असतो. आम्ही चांगल्या प्रकारे समन्वय राखतो. मी केंद्रीय गृह मंत्रालयाशी चांगल्या प्रकारे समन्वय साधू शकतो. एकनाथ शिंदे किंवा अजित पवार देखील ते करू शकतात. परंतु, माझा केंद्रीय नेतृत्वाशी जास्तीत जास्त संबंध येतो. त्यामुळे गृहमंत्रालय हे आमच्याकडे असावं, भारतीय जनता पार्टीकडे असावं असं मला वाटतं”.