नांदेड : भारतीय जनता पार्टीमध्ये जिल्हाध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान इच्छुक उमेदवाराच्या वयोमानासह इतर काही अर्हता निश्चित करून देण्यात आली होती, पण नांदेड महानगरसह अनेक संघटनात्मक जिल्ह्यांमध्ये अर्हतेत तडजोड करून जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर झाल्याचे सांगण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागाचे दोन आणि महानगराचा एक हे तीनही जिल्हाध्यक्ष ४५ ते ६० या निर्धारित वयोगटातील आहेत. पण महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांचे नाव इतर अटींमध्ये (अर्हता) बसत नसतानाही पहिल्या यादीतच त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. अध्यक्षपदाचा उमेदवार संघटनेचा अनुभवी कार्यकर्ता असावा, त्याने यापूर्वी संघटनेत जबाबदारीच्या पदावर काम केलेले असावे तसेच तो सलग दोन कार्यकाळातील (टर्म) सक्रिय सदस्य असावा, असे अर्हतेच्या बाबतीत स्पष्ट करण्यात आले होते. तसेच नवीन पक्षप्रवेश झालेल्या कार्यकर्त्याचा अध्यक्षपदासाठी विचार केला जाणार नाही, असेही कळविण्यात आले होते, पण राजूरकर यांच्या बाबतीतही अर्हताच गुंडाळण्यात आली. नांदेड जिल्हा १६ तालुक्यांत विभागला असून ग्रामीण भागात मराठा समाजासह ओबीसी, अनुसूचित जमातीची लोकसंख्या लक्षणीय आहे. मराठा समाजात देशमुख-पाटील अशीही विभागणी आहे; पण भाजपाच्या राज्य नेतृत्वाने उत्तर आणि दक्षिण या संघटनात्मक जिल्ह्यांमध्ये दोन्ही जिल्हाध्यक्ष देशमुख-मराठा समाजातून केल्यामुळे पक्षाशी जोडले गेलेले ‘अकरा’ या वर्गवारीतील मराठा कार्यकर्ते नाराज झाले, असल्याचे दिसत आहे. नायगाव तालुक्यातील श्रावण भिलवंडे हे पक्षाचे खूप जुने कार्यकर्ते व पदाधिकारी. अध्यक्षपदासाठी त्यांचेही नाव समोर आले होते. पण त्यांच्या पदरी पुन्हा निराशा पडली.
खासदार अशोक चव्हाण यांनी उत्तर जिल्ह्यासाठी काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आपल्या काही समर्थकांची नावे पुढे केली होती, पण पक्षाने ती सर्व नावे बाजूला ठेवत किशोर देशमुख यांची फेरनिवड केली. ही बाब चव्हाण यांना धक्का देणारी तर माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना सुखावणारी मानली जात आहे. गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधी भाजपाने नांदेड उत्तर जिल्ह्याचे अध्यक्ष सुधाकर भोयर यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी चिखलीकर यांच्या शिफारशीवरून किशोर देशमुख यांची नियुक्ती केली होती. नंतर अशोक चव्हाण भाजपात आल्यानंतर त्यांना तेव्हाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम चालवावे लागले. नव्या प्रक्रियेत देशमुख यांना हटवले जाईल, असे चव्हाणांच्या समर्थकांना वाटत होते, पण तसे काही घडले नाही. आता गोविंदराव नागेलीकर, बाळासाहेब बारडकर, संजय लहानकर, किशोर स्वामी आदी चव्हाण समर्थकांना देशमुखांच्या नेतृत्वाखाली काम करावे लागेल, असा आदेशच पक्षाने दिला आहे.
मराठवाड्यात भाजपाचे औरंगाबादसह नांदेडमध्येच तीन संघटनात्मक जिल्हे आहेत. पण या सर्व जिल्ह्यांमध्ये महिलांना अध्यक्षपदाची संधी देण्यात आलेली नाही. नांदेड दक्षिणमध्ये पूनम राजेश पवार यांचे नाव चर्चेत आले होते, पण पक्षाने त्यांना संधी दिली नाही. दोन्ही जिल्हाध्यक्ष देशमुख गटाचे झाल्यामुळे भाजपात या गटाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
हंबर्डेंकडून श्रेष्ठींच्या नावांचा उल्लेख
जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल डॉ. संतुक हंबर्डे यांनी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष व कार्याध्यक्ष यांच्या नावांचा उल्लेख आवर्जून केला. पण स्थानिक पातळीवरील कोणत्याही नेत्याचे नाव त्यांनी घेतले नाही. आगामी निवडणुकांसाठी आमची सारी सज्जता झाली असल्याचे डॉ. हंबर्डे यांनी स्पष्ट केले.