रत्नागिरी:  ७० लाख रुपये किमतीच्या चार आलिशान मोटारींची बनावट कागदपत्रे तयार करून परस्पर विकल्याने दोघांना रत्नागिरीतून शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश रामचंद्र सुर्वे (वय ३३) रा. खेडी, शिवाजीनगर, चिपळूण आणि हसन मगदूम जहागीरदार (वय ३१) रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सागर हरी देसाई (वय ३८) रा. टेंबलाईवाडी यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

फिर्यादी सागर देसाई हे कमिशन बेसिसवर मोटारींची विक्री करतात. त्यांनी त्यांच्या मालकीच्या चार आलिशान मोटारी विक्री करण्यासाठी संजय हवालदार (कळंबा), नीलेश सुर्वे आणि हसन मगदूम यांच्याकडे दिल्या होत्या. या मोटारींच्या विक्रीतून २ लाख रुपये कमिशन देण्याचे हवालदार आणि इतरांनी कबूल केले होते.

एप्रिल २०२४ ते मे २०२४ या कालावधीत आरोपींनी या गाड्या ताब्यात घेतल्या. परंतु, त्यांनी फिर्यादीला या गाड्यांच्या विक्रीचा मोबदला दिला नाही. त्याऐवजी, आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार करून या चारही मोटारींची परस्पर विक्री महंमद हाजी (छत्रपती संभाजीनगर) आणि मनीष फुके (नागपूर) यांना केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपली फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर  सागर देसाई यांनी २२ मे २०२५ रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर, पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आकाश जाधव यांच्या पथकाने कारवाई करत रत्नागिरीतील या दोघा दलालांना अटक केली आहे.