गेल्याकाही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी पावसास सुरुवात झाली आहे. कोकणसह आमरावतीतील काही भागांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापनासह इतर यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (एसडीआरएफ) ११ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच बेस स्टेशनवर एनडीआरएफच्या ९ आणि एसडीआरएफच्या ४ अशा एकूण १३ टीम सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

हेही वाचा – जिल्हा वार्षिक योजनेतून प्रशासकीय मान्यता दिलेल्या सर्व कामांना शिंदे-फडणवीस सरकारची स्थगिती

नद्यांच्या पातळीत वाढ

राज्यातील संपूर्ण कोकणसह अमरावती विभागातील काही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच काही ठिकाणी नदीच्या पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक पातळीवर उपाय योजना करण्यात येत आहेत. तसेच आवश्यक असणाऱ्या ठिकाणी राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

कोकणात मुसळधार पाऊस

आज दुपारी १२ वाजेपर्यंत कोकण विभागातील पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १०० मिमी. पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असून हवामान विभागाकडून अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत गेल्या २४ तासात कुलाबा येथे ११७ मिमी तर सांताक्रूझ येथे १२४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा- राष्ट्रवादीची सुपारी घेऊन संजय राऊतांना शिवसेना संपवायची होती; सेनेचे बंडखोर आ. संजय गायकवाड यांचा घणाघाती आरोप

परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद

रत्नागिरी जिल्ह्यात सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही. मात्र, जिल्ह्यातील २ नद्या इशारा पातळीच्या वर वाहत असून जिल्हा प्रशासन सतर्क आहे. तसेच वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई- गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून वाहतूक अन्य मार्गाने वळण्यात आली आहे.

अमरावतीत पूरस्थिती

पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यात सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही, मात्र नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने एनडीआरएफच्या दोन तुकड्या तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील चांदूरबाजार आणि मोर्शी येथे पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली असून गावातील लोकांना सुरक्षित स्थळी नेण्याचे काम सुरु असून, सद्यस्थितीत जिल्ह्यात स्थानिक बचाव पथके कार्यरत आहेत.