सावंतवाडी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील ऐतिहासिक राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्यालगतची जमीन खचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुतळ्याच्या डाव्या बाजूला भगदाड पडले असून, त्या ठिकाणी जमीन खोलवर खचल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. सुदैवाने, चबुतरा आणि पुतळा भक्कम असून त्याला कोणताही धोका पोहोचलेला नाही, मात्र चबुतऱ्यालगतची जमीन खचल्याने या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा हा पुतळा यापूर्वीही नौदल दिनाच्या निमित्ताने उभारण्यात आला होता, परंतु तो अल्पावधीतच कोसळला होता. त्यानंतर राज्य सरकारने पुन्हा हा पुतळा उभारण्याचे काम हाती घेतले होते आणि हल्लीच याचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला होता. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, तसेच बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आदी प्रमुख नेते उपस्थित होते.
नवीन पुतळा उभारल्यानंतर अवघ्या काही काळातच चबुतऱ्यालगतची जमीन खचल्याने बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याची चर्चा जाणकारांमध्ये सुरू झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, चबुतऱ्यालगतची जमीन भुसभुशीत असल्याने अतिवृष्टीमुळे ती खचून भगदाड पडल्यासारखा प्रकार घडला आहे. यामुळे पुतळ्याला किंवा चबुतऱ्याला थेट धोका नसला तरी, अशा ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या ठिकाणी झालेल्या बांधकामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. मात्र, शासनाने इतका निधी खर्च करून उभारलेल्या या महत्त्वाच्या स्मारकाच्या बांधकामात अशी घटना घडणे चिंताजनक आहे.या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या बांधकामात अशा प्रकारची निष्काळजी सहन केली जाणार नाही, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.