MLA Bachchu Kadu On CM Eknath Shinde : विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपलेली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारसंघामध्ये दौरे, बैठका, कामाचा आढावा राजकीय नेतेमंडळी घेत आहेत. असं असतानाच प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी सोमवारी हिंगोलीत एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना इशारा दिला होता. राज्यातील दिव्यांगांच्या आणि कामगारांच्या प्रश्नांवरून बच्चू कडू आक्रमक झाले होते. यावेळी “मुख्यमंत्र्यांचा गणपती करू, समुद्रात उचलून टाकू”, असं विधान बच्चू कडू यांनी केलं होतं. दरम्यान, या विधानावर आता बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

बच्चू कडू काय म्हणाले?

“आम्ही आता आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहोत. प्रहारचा एक आमदार बच्चू कडू आणि दुसरा राजकुमार हे आहेत. आता येणाऱ्या निवडणुकीत आमचे जर २० आमदार निवडून आले आणि शेतकरी, मंजूरांच्या हिताचे निर्णय राज्यात झाले नाही तर मग आम्ही मुख्यमंत्र्यांचा गणपती करु, असं माझ्या म्हणण्याचा अर्थ होता”, असं स्पष्टीकरण बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी आज माध्यमांशी बोलताना दिलं.

हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बच्चू कडू यांचा इशारा; म्हणाले, “उचलून थेट…”

बच्चू कडू पुढे म्हणाले, “आमच्या दिव्यांग आणि शेतमजूरांच्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातून लोक येणार आहेत. ९ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आमचं आंदोलन आहे. आमचा मोर्चा हा शेतकऱ्यांसाठी आहे. आता भारतीय जनता पार्टी हिंदुत्वाचा नारा देत आहे. काँग्रेस पुन्हा जातीचे नारे देत आहे. आम्ही शेतकरी आणि शेतमजूरांचा नारा देत आक्रोश मोर्चा काढत आहोत”, असंही त्यांनी म्हटलं.

बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांना काय इशारा दिला होता?

हिंगोलीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना बच्चू कडू म्हणाले होते की, “मुख्यमंत्र्यांचा आम्ही गणपती करू, उचलून थेट समुद्रात टाकू. त्यासाठी तुमची साथ पाहिजे. त्यासाठी तुमचा आशीर्वाद पाहिजे”, असं म्हणत बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला होता. तसेच विधानसभेमध्ये प्रहारचे फक्त दोनच आमदार आहेत, तरीही ते घाम फोडल्याशिवाय राहत नाहीत, असंही बच्चू कडू यांनी म्हटलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बच्चू कडू विधानसभेला काय भूमिका घेणार?

आमदार बच्चू कडू हे महायुतीमध्ये आहेत. मात्र, तरीही त्यांनी लोकसभा निवडणुकीत वेगळी भूमिका घेत अमरावती लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभा केला होता. तसेच बच्चू कडू यांनी अनेकदा महायुती सरकारवर टीकाही केली होती. विधानसभा निवडणुकीबाबत बोलतानाही त्यांनी अनेकदा सूचक विधानं केलेली आहेत. त्यामुळे त्यांची विधानसभेला काय भूमिका असणार? याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे.