Mumbai Arthur Road Jail : अंमलबजावणी संचलनालयाने आर्थिक गैरव्यवहार (मनी लाँडरिंग) प्रकरणात कारवाई केलेल्या एका आरोपीने तुरुंगात जैन पद्धतीने जेवण मिळत नसल्याचा आरोप करत न्यायालयात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर तुरुंगात जैन पद्धतीने जेवण का नाही? असा सवाल न्यायालयाने विचारत संबंधित तुरुंग अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती समोर आली आहे.

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचलनालयाने अटक केलेल्या आणि सध्या मुंबईतील आर्थर रोड कारागृहात असलेल्या एका कैद्याला जैन पद्धतीचं जेवण देण्याचा आदेश देऊनही ते दिले जात नसल्यामुळे न्यायालयाने तुरुंग अधीक्षकांना नोटीस बजावली आहे. आदेश देऊन देखील जैन पध्दतीचे जेवण का दिलं नाही? असा सवाल न्यायालयाने यावेळी कारागृह अधीक्षकांना केला आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

ईडीने मार्चमध्ये मनी लाँडरिंग प्रकरणात रितेशकुमार एस शाह यांना अटक केली होती. मालेगावमधील रहिवाशांच्या बँक खात्यांचा गैरवापर करत मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप रितेशकुमार एस शाह यांच्यावर आहे. दरम्यान, न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही आपल्याला जैन जेवण दिलं जात नसल्यामुळे मे महिन्यापासून फक्त चपाती खाऊन जगत असल्याची तक्रार आरोपीने न्यायालयात केली होती.

दरम्यान, रितेशकुमार एस शाह यांनी ९ मे रोजी विशेष न्यायालयासमोर एक याचिका दाखल केली आणि सांगितलं की ते जैन धर्माचे अनुयायी आहेत आणि धार्मिक आवश्यकतांनुसार कठोर आहाराचं पालन करत आहेत. याचिकेत म्हटलं की, “आर्थर रोड तुरुंगात दिलं जाणारं अन्न त्यांच्या आहाराच्या गरजांनुसार नसतं. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होत असून वजन मोठ्या प्रमाणात कमी झालं आहे.” त्यांचा हा युक्तिवाद मान्य करत १४ मे रोजी विशेष न्यायालयाने तुरुंग अधिकाऱ्यांना निर्देश देत जैन अन्न पुरवण्याचे निर्देश दिले होते.

दरम्यान, २४ जून रोजी शाह यांच्या वकिलांनी न्यायालयात धाव घेत न्यायालयाच्या निर्देशांनंतर देखील जैन जेवण देण्यात आलं नसल्याचं न्यायालयाला सांगितलं. त्यामुळे हे न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन आहे, तसेच भारतीय संविधानाच्या कलम २१ अंतर्गत आरोपीच्या मूलभूत अधिकारांचं देखील उल्लंघन असल्याचं याचिकेत म्हटलं. दरम्यान, न्यायालयाने कारागृह अधीक्षकांना नोटीस बजावत शुक्रवारपर्यंत अहवाल मागितला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावर आर्थर रोड तुरुंगाचे अधीक्षक हर्षद अहिरराव यांनी सांगितलं की, “आरोपीच्या आहाराच्या गरजेनुसार अन्न त्यांना देण्यात आलं आहे. आम्ही त्यांना कांदा लसूणशिवाय जैन जेवण पुरवलं आहे. आरोपी घरून जेवण मागत होता जो आम्ही नाकारला कारण न्यायालयाचा असा कोणताही आदेश नाही”, असं तुरुंगाच्या अधीक्षकांनी स्पष्टीकरण दिलं आहे.