Ashok Chavan / नांदेड : १९९२ साली अयोध्येतील विवादास्पद वास्तूचा ढाचा पाडण्यात आल्यानंतर तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांनी सामाजिक तेढ वाढविणार्या या प्रकरणात भाजपा, विहिंप यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर ‘कठोर प्रहार’ केला होता; पण त्यानंतर ३३ वर्षांनी आपली शताब्दी साजरी करणार्या संघाच्या गुरुवारी येथे झालेल्या पथ संचलनावर शंकररावांचे पुत्र अशोक चव्हाण यांना भाजपा खासदार या नात्याने ‘पुष्पवर्षाव’ करावा लागला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विजयादशमीदिनी दरवर्षी पथ संचलन असते. या संघटनेच्या स्थापनेस गुरुवारी १०० वर्षे पूर्ण झाल्यामुळे यंदाच्या पथ संचलनास महत्त्व प्राप्त झाले होते. या उपक्रमाची पत्रिका जारी करून नांदेड शहर शाखेने पथ संचलनाचा मार्ग आधीच निश्चित केला होता.
त्यानुसार पथ संचलनातील स्वयंसेवक शिवाजीनगर भागातून जाणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर या वसाहतीतील ज्या मार्गावर चव्हाण यांचे निवासस्थान आहे, त्या मार्गावर आधीच साफसफाई झाली होती.
स्वयंसेवक या मार्गावरून शिस्तीत जाणार म्हणून रस्त्यावर रांगोळी काढण्यात आली. स्वयंसेवक या मार्गावरून जात असताना पुष्पवर्षावासाठी जमलेल्या भाजपा कार्यकर्त्यांत खा.अशोक चव्हाण सहभागी झाल्याचे दृश्य पहिल्यांदाच बघायला मिळाले.
चव्हाण परिवाराच्या म्हणजेच माजी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पथ संचलनातील स्वयंसेवक आल्यानंतर भाजपाचे महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, माजी महापौर मोहिनी येवनकर, विजय येवनकर प्रभृतींनीही या पथकावर फुलांची उधळण करत मातृसंस्थेच्या कार्यकर्त्यांचा सन्मान केला. शिवाजीनगर भागात, चव्हाणांच्या घरासमोर असे दृश्य प्रथमच बघायला मिळाल्याचे त्या भागातील रहिवाशांनी सांगितले.
नांदेडमधील शिवाजीनगर वसाहतीला शंकरराव चव्हाण, श्यामराव कदम, आबासाहेब लहानकर या काँग्रेसी दिवंगत नेत्यांच्या वास्तव्यामुळे फार पूर्वीच वलय लाभले होते. त्यांच्या पश्चात त्यांचे वारस याच वसाहतीत राहतात. अशोक चव्हाण भाजपामध्ये जाण्यापूर्वी या भागात सदैव काँग्रेसचे झेंडे फडकत होते. मागील २५ वर्षांत काँग्रेसमधील असंख्य घडामोडी चव्हाण यांच्या घरामध्येच झाल्या.
या पार्श्वभूमीवर पूर्वीचा जनसंघ असो किंवा संघ-त्यांच्या विचारधारेला नांदेडमधील शिवाजीनगर भागाने कधीच थारा दिला नाही. तीच रीत भाजपाच्या बाबतीत पाळली गेली; पण या वसाहतीत आता हिंदुत्वाचे वारे वाहू लागले असून श्यामरावांचा नातू अमोल भाजपात आहे, तर नांदेडमधील भाजपाचे नेतृत्व अशोक चव्हाणांकडे गेले आहे.
‘विहिंप, रा.स्व.संघ व भाजपा यांनी एकत्रित विचारधारणेतून भारतीयांच्या हृदयामधल्या पवित्र विश्वासाला तडा देण्याचे काम केले आहे’, असे शंकरराव चव्हाण यांनी अयोध्येतील विवादास्पद ढाचा पाडण्यात आल्यावर लोकसभेतील आपल्या भाषणात म्हटले होते. पण त्यांच्या निधनानंतर २१ वर्षांनी शंकररावांच्या नांदेडमधील शिवाजीनगरातल्या निवासस्थानासमोरच संघाच्या शताब्दीनिमित्त स्वयंसेवकांचा जयजयकार झाला.
डी.पी.सावंत अनुपस्थित
काँग्रेसचे माजी मंत्री डी.पी.सावंत हेही शिवाजीनगरातच वास्तव्यास आहेत. नाही, नाही म्हणत काही महिन्यांपूर्वी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. मागील पंधरवड्यातील अतिवृष्टीनंतर सावंत यांनी आपल्या ‘आई’ निवासामधून ‘काळ्या आई’कडे धाव घेत ठिकठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी करत आपल्या सक्रियतेचा संदेश दिला. संघाचे पथ संचलन शिवाजीनगरातून जात असताना सावंत मात्र रस्त्यावर दिसले नाहीत.