पंढरपूर : कायद्याच्या कक्षेत बसून सर्वसामान्य वाहनचालकांना तपासणी नाक्यांवर विनाकारण त्रास दिला जात आहे. तसेच या ठिकाणी अनेक चुकीच्या गोष्टी घडत असल्याने त्यास पायबंद घालण्यासाठी शासन नवीन धोरण आखत आहे. त्या अनुषंगाने आंतरराज्य सीमांवर असलेली परिवहन विभागाची सर्व तपासणी नाकी बंद करण्याबाबत शासन लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
सोलापूर शासकीय विश्रामगृह येथील सभागृहात आयोजित शासकीय विभाग प्रमुख व पदाधिकारी यांच्या आढावा बैठकीत परिवहन मंत्री सरनाईक मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
परिवहन मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की, १५ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीतील नांदणी येथील तपासणी नाक्याला आपण स्वतः भेट दिलेली. या वेळी या नाक्यावरून रोज किती गाड्या ये-जा करतात तसेच अतिरिक्त भार असलेल्या किती गाड्यांवर कारवाई केली याचा सविस्तर अहवाल लेखी स्वरूपात सादर करण्याबाबत सूचना परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकांचे नुकसानीचे पंचनामे प्रशासकीय स्तरावर सुरू आहेत. यातून एकही शेतकरी वंचित राहणार नाही या दृष्टीने प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे. तसेच अतिवृष्टीने सोलापूर शहरातील अनेक भागांत नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलेले होते त्याचेही पंचनामे करावेत अशा सूचना सरनाईक यांनी दिल्या.
विमानतळ प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाने सोलापूर येथून मुंबईसाठी विमान सेवा लवकरच सुरू होईल या दृष्टीने संबंधित विमान कंपनीकडे पाठपुरावा करावा. तसेच सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विमानतळ प्राधिकरणाने प्रयत्न केले पाहिजेत, अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी दिल्या.
जिल्ह्यातील मंद्रूप, दुधनी व बोरामणी येथे राज्य परिवहन महामंडळाचे बस स्थानक होण्यासाठी आवश्यक जागेची उपलब्धता महसूल प्रशासनाकडून व्हावी. एस.टी. महामंडळाचे विभाग नियंत्रक यांनी उपरोक्त ठिकाणी भेटी देऊन जागा पाहणी करावी व सदरची जागा महसूल प्रशासनाकडून मिळण्याबाबत पाठपुरावा करावा. तसेच सोलापूर येथील एसटी महामंडळाचे वर्कशॉप एमआयडीसी येथील नवीन जागी लवकरात लवकर सुरू करावे, असेही निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले.
प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी १० सप्टेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची माहिती दिली. तसेच पंचनामे कार्यवाही पूर्ण होत असून त्याचा सविस्तर प्रस्ताव शासनाला पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.