Raj Thackeray On Mumbai Local Train Accident : मुंबईजवळील दिवा-मुंब्रा रेल्वेस्थानकादरम्यान आज एक मोठी दुर्घटना घडली. एका लोकल रेल्वेगाडीतून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला. लोकलमधील गर्दीमुळे काही प्रवासी डब्याच्या दरवाजाला लटकून प्रवास करत असताना ही घटना घडल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. या घटनेनंतर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, या घटनेवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील संतप्त प्रतिक्रया दिली आहे. ‘मुंबईत गर्दी नवी नाही, पण रेल्वे मंत्री काय करतायेत?’, असा सवाल राज ठाकरे यांनी सरकारला विचारला आहे.
राज ठाकरे काय म्हणाले?
“मी तुम्हाला एवढ्या वर्षांपासून सांगतो की आपल्या सर्व शहरांत बाहेरून येणारे जे लोंढे आहेत त्यामुळे रेल्वे कोलमडली आहे. सध्या रेल्वेचा बोजवारा उडालेला आहे. सर्व वाहतुकीचा बोजवारा उडालेला आहे. वाहनांसाठी रस्ते नाहीत, लोकांना चालण्यासाठी फुटपात नाहीत. आपल्या शहरात कोण येतंय आणि कोण जातंय माहित नाही. फक्त शहरांत मेट्रो सुरु केल्याने प्रश्न सुटणार नाहीत. मुंबईत मेट्रो आहेत, सर्व आहे मग असं असताना नव्या वाहनांची नोंदणी थांबली आहे का? नाही थांबली. मग नक्की मेट्रो कोण वापरतंय? बाहेरून येणाऱ्या लोकांच्या लोंढ्यांमुळे राज्यात बोजवारा उडाला आहे. याकडे कोणी पाहायला तयार नाही”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
“आपल्याकडे सर्वजण फक्त निवडणुकीतच गुंतले आहेत. शहरांची अवस्था बिकट झालीय, शहरं म्हणून बघायला कोणी तयार नाही. शहरांबाबत बोललं तर माध्यमांमध्ये त्याला किंमत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या बातम्या चालवल्या, तेवढ्या बातम्या आता रेल्वेच्या या घटनेवर चालवणार आहात का? आपण कशाला महत्व द्यायचं? हे समजत नाही. मला वाटतं की केंद्र सरकारने या सर्व गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.
“रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही जर दररोजची गर्दी पाहिली तर लोकं रेल्वेच्या डब्यात कसे जातात? आणि बाहेर कसे येतात हा प्रश्न आहे. रेल्वेचा प्रवास मी देखील केलेला आहे. लोकांची संख्या आत्ताच वाढलेली नाही, मुंबईतील गर्दीबाबत सरकारला माहिती आहे. मग रेल्वे मंत्री म्हणून ते काय करतात? रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा नाही तर तिकडे जाऊन पाहावं काय परिस्थिती आहे. लोकलला दरवाजे बसवले तर लोकं आत गुदमरून मरतील. रेल्वेत किती गर्दी असते तुम्हाला कल्पना नाही. रेल्वेच्या डब्याची एक जागा लोकांना बाहेर जाण्यासाठी पाहिजे, एक जागा आत जाण्यासाठी पाहिजे. मात्र, काहीही नाही सर्व गोंधळ आहे”, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
“आपल्या देशांत माणसांची किंमत नाही. रेल्वे दुर्घटनेनंतर सरकारने तातडीने लक्ष दिलं पाहिजे. अशी घटना समजा दुसऱ्या देशांत घडली असती तर ते त्या घटनेकडे कसे पाहतात? आपले सर्व मंत्री वैगेरे परदेशात जातात ते तिकडून काय घेऊन येतात? तिकडची रेल्वे आणू नका, पण तिकडचे विचार तरी तुम्ही इकडे आणा”, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.