Sanjay Raut on Shivsena UBT – MNS Alliance : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अलीकडेच मराठी भाषेच्या व मराठी माणसाच्या हिताच्या मुद्द्यावर मनसे व शिवसेना (ठाकरे) हे पक्ष एकत्र येण्याबाबत संकेत दिले होते. तेव्हापासून या दोन पक्षांच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे यांनी साद घातल्यानंतर शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील मागे हटले नाहीत. त्यांनीही राज ठाकरे यांना प्रतिसाद दिला होता. तसेच शिवसेनेचे (ठाकरे) आमदार आदित्य ठाकर म्हणाले, “महाराष्ट्र हितासाठी आपण कोणत्याही पक्षाबरोबर एकत्र यायला तयार आहोत, म्हणूनच आम्ही मनसेला साद दिली आहे”

शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत, आमदार अनिल परब, आमदार अंबादास दानवे, आमदार सुनील प्रभू यांनी देखील अनेकदा युतीबाबत अनुकूलता दर्शवली आहे. तशी वक्तव्ये देखील या नेत्यांनी केली आहेत. मात्र, “ठाकरे गटाने केवळ प्रसारमाध्यमांसमोर चर्चा न करता थेट एकमेकांशी चर्चा करावी, उचित प्रस्ताव पाठवावा”, असा सल्ला मनसे नेत्यांनी दिला आहे.

दोन्ही भावांनी महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायला हवं : संजय राऊत

मनसेच्या सल्ल्यावर संजय राऊत म्हणाले, “लग्न, साखरपुडा, मधुचंद्र या जुन्या संज्ञा आहेत. मुंबईवर अदाणींचं अतिक्रमण चालू आहे. अदाणी व शेठजी आक्रमण करत आहेत. दिल्लीसह गुजरातच्या भूमीवरून मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं, मराठी माणसाला जमीनदोस्त करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. मुंबई फुकटात गौतम अदाणींच्या घशात घातली जात आहे. विद्यमान सरकार महाराष्ट्राचं हित पाहत नाही. त्यामुळे मला वाटतं की दोन्ही भावांनी (उद्धव ठाकरे व राज ठाकरे) महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन हे आक्रमण थांबवलं पाहिजे. ते दोघेही एकत्र येतील”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आम्ही महाराष्ट्र हितासाठी कोणताही त्याग करायला तयार आहोत”

संजय राऊत म्हणाले, “मराठी माणसाचा विचार घेऊन राज ठाकरे यांनी स्वतंत्र संघटन उभं केलं आहे. प्रकाश आंबेडकरांनी देखील अशीच संघटना उभी केली आहे. या सर्वांनी आता एकत्र यायला पाहिजे. अन्यथा मुंबई आपल्या हातात राहणार नाही. आमचे नेते मनसेबरोबरच्या युतीबाबत एका सुरात बोलत आहेत. आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि आम्ही सर्वजण एका सुरात बोलतोय. त्यावर कोणीही आक्षेप घेण्याचं कारण नाही. आमच्या भावना निर्मळ, स्वच्छ व स्पष्ट आहेत. आम्ही महाराष्ट्र हितासाठी कोणताही त्याग करायला तयार आहोत”.