सातारा : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पी.ओ.पी.) गणेश मूर्ती नद्या व तलावांमध्ये विसर्जित केल्या तर पाणी प्रदूषित होते. हे पाणी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे पालिकांनी कृत्रिम तलाव व ग्रामपंचायतींनी जलकुंड गणपती विसर्जनासाठी तयार केले आहेत. त्यामध्ये सार्वजनिक गणेश मंडळांनी व नागरिकांनी गणपती विसर्जित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.
गणेशोत्सवात जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासन यांनी पर्यावरणपूरक गणपती विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे. शेंद्रे (ता. सातारा) इंदोली (ता. कराड) येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, सातारचे प्रांताधिकारी आशिष बारकुल, कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यातील ५०० ग्रामपंचायतींमध्ये गणेश विसर्जनासाठी कृत्रिम जलकुंड तयार करण्यात आले आहेत, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, तयार करण्यात आलेल्या जलकुंडांमध्ये नागरिकांनी आपले घरगुती गणपती विसर्जित करावेत. गणपती सजावटीसाठी प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर होतो, ते गोळा करण्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये सोय करण्यात आली आहे. तेथे प्लास्टिक जमा करावे.
काही गावांतील नागरिकांनी गणपतीची मूर्ती दान करण्याचा निर्धार केला आहे. दान केलेल्या मूर्ती व्यवस्थित ठेवून त्याचा पुनर्वापर करावा. पुढील वर्षी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीचा वापर टाळावा. शाडूमातीच्या मूर्ती पाण्यात सहज विरघळल्याने नद्या व तलाव प्रदूषित होत नाही. सामूहिकरित्या साजरा केलेला पर्यावरणपूरक गणेशोत्सव नागरिकांमध्ये एकोपाही वाढवतो आणि श्रद्धा, परंपरा आणि पर्यावरण संवर्धन या गोष्टी साधल्या जावू शकतात, असेही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी सांगितले.
शेंद्रे व इंदोली येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेमार्फत गणपती विसर्जनासाठी करण्यात आलेल्या सोयीबद्दल समाधान व्यक्त करत हा उपक्रम राज्यात आदर्शवत ठरेल, असा विश्वासही व्यक्त केला.
५०० ग्रामपंचायतींमध्ये जलकुंड
सातारा जिल्ह्यातील ५०० ग्रामपंचायतींमध्ये गणेश विसर्जनासाठी कृत्रिम जलकुंड तयार करण्यात आले आहेत. या तयार करण्यात आलेल्या जलकुंडांमध्ये नागरिकांनी आपले घरगुती गणपती विसर्जित करावेत. गणपती सजावटीसाठी प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर होतो, ते गोळा करण्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये सोय करण्यात आली आहे. तेथे नागरिकांनी प्लास्टिक जमा करावे असेही आवाहन करण्यात आले आहे.