सातारा: सातारा , कास पठार, वाई, जावली आणि पुणे बंगळूर महामार्ग परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे. या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिवसभर राहिलेल्या पावसाने नागरिकांची चांगली तारांबळ उडाली. जिल्ह्यात १२२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

कण्हेर धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरण पायथा विद्युतगृहा मधून सायंकाळी सात वाजल्यापासून ५०० क्युसेक्स पाणी विद्युतगृहातून वेण्णा नदीपात्रात सोडण्यात आले. तर शुक्रवार (दि २०) रोजी सकाळी सहा पासून सांडव्या वरून नदी पात्रात अंदाजे एक हजार क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे. कोयना धरणातील पाणीसाठा २८ टीएमसी वर पोहोचला असून उपयुक्त पाण्याची टक्केवारी २५ टक्के आहे

आजच्या पावसाने शेतात पाणी साठले. यामुळे पेरण्या लांबल्या आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. मागील चार दिवस सुरू असणाऱ्या संततधार पावसाने गुरुवारी रात्रीपासून जोर धरला आहे. सातारा शहरात आयडीबीआय बँकेकडून पोवई नाक्याकडे उतार असल्याने रस्त्यावरून पाण्याची लोट वाहत आहेत. त्यामुळे पदचार्यांची आणि दुचाकी स्वरांची चांगली तारांबळ उडत आहे.

पावसाने जोर धरल्याने शहरात ठिकठिकाणी पाणी साठले. कास पठार वरही जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे. जावळी वाई तालुक्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे बलकवडी आणि धोम धरणातील पाणी पातळी वाढत आहे. वाई तालुक्यातील चांदकचा तलाव भरून वाहत असल्याने जोड तलाव गुळुंबच्या पाणी पातळी वाढ होत आहे.

महामार्गावर वाढे खेड फाट्यावर खड्डे पडले आहेत. या पावसाने महामार्गाची ही दाणादाण उडाली आहे. महामार्गावर पाणी साठल्याने वाहन चालकांना वाहन चालवताना शिकस्त करावी लागत आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक संथावली आहे. महाविद्यालयीन, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची नोकरदार आणि चकरमान्यांची आज चांगली तारांबळ उडाली एकूणच या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कण्हेर (ता सातारा) धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा आवक सुरू झाला आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरण पायथा विद्युतगृहा मधून ५०० क्युसेक पाणी सायंकाळ पासून पाणी वेण्णा नदीपात्रात सोडण्यात आले. शुक्रवार सकाळ पासून सांडव्या वरून वेण्णा नदी पात्रात अंदाजे एक हजार क्युसेक पाणी सोडण्यात येईल आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येणाऱ्या येवानुसार धरणामधून सोडण्यात येणार्या विसर्ग मध्ये बदल करण्यात येईल. धरणामधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे वेण्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत आला आहे. नदी तीरावरील गावातील नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये. नदी काठावरील ग्राम प्रशासन व संबंधित यंत्रणा यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. महाबळेश्वर येथे १८९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्याच्या पूर्व भागातह पावसाचा जोर कमी असला तरी पावसाची रिमझिम मात्र कायम आहे .