सोलापूर: राज्याच्या राजकारणात शरद पवार आणि अजित पवार हे कधीही एकमेकांपासून दूर झाले नाहीत. आतून ते एकच आहेत. त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले काय आणि दूर राहिले काय, सामान्य जनतेला काही फरक पडत नाही, अशा शब्दांत प्रहार संघटनेचे नेते, माजी आमदार बच्चू कडू यांनी दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या ऐक्यासंदर्भात कडवट भाष्य केले आहे.

सोलापुरात पक्षाच्या कार्यक्रमासाठी बच्चू कडू आले होते. त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यावर संवाद साधला. ते म्हणाले, की शरद पवार आणि अजित पवार हे दोघे कधीही एकमेकांपासून दूर झाले होते, याची मला तरी खात्री होत नाही. आता दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. हे केवळ सत्तेसाठी चालले आहे, असे वाटते. परंतु दोन्ही पक्ष पुन्हा एक झाले काय, किंवा नाही झाले काय, सामान्य जनतेच्या दृष्टीने काही फरक पडत नाही.

राज्यातील शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार तरुण, महिलांच्या प्रश्नावर महायुती सरकारने निवडणुकीत दिलेली आश्वासने पाळली नाहीत. त्यामुळे अर्थखाते ताब्यात असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतून येत्या २ जूनपासून आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.दरम्यान कडू हे सोलापुरात दाखल झाले असताना त्यांच्या वाहनांचा ताफा एका मुस्लिम समुदायाने अडविला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कडू यांच्या प्रहार संघटनेच्या एका कार्यकर्त्याकडून मशिदीच्या विश्वस्त मंडळींना खंडणीसाठी जाणीवपूर्वक त्रास होत आहे. त्या कार्यकर्त्यावर कठोर कारवाईची मागणी कडू यांच्याकडे केली. त्याची दखल घेऊ असे कडू यांनी आश्वासन दिले.दरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने केलेल्या पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्याच्या संदर्भात बच्चू कडू यांनी, भारतीय लष्कराने अभिमान वाटेल, अशी कामगिरी केली असताना मधूनच अमेरिकेच्या सांगण्यानुसार भारतीय लष्कराने कारवाई थांबवली आहे. किमान पाकव्याप्त काश्मीरचा भाग तरी ताब्यात घ्यायला हवा होता. आजही इंदिरा गांधी यांच्यासारख्या कणखर नेतृत्वाची देशाला गरज आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.