सातारा : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देणाऱ्या हैदराबाद गॅझेटिअरच्या संदर्भाचा शासन निर्णय सर्वसमावेशक पद्धतीने लागू होणार आह. त्याच पद्धतीने सातारा गॅझेटिअरबाबतही अभ्यास करून त्याबाबतही लवकरच शासन निर्णय जाहीर केला जाईल. त्या संदर्भातील राज्य शासनाने तयारी सुरू केली आहे. उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत तातडीने बैठक घेण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

मराठा समन्वयक समितीच्या सत्कार सोहळ्यात शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, की सातारा गॅझेटिअरच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा साताऱ्यात मराठा समन्वयक समितीच्या माध्यमातून जंगी सत्कार करू. कारण मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा समाजाला एकदा नाही दोनदा आरक्षण दिले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हा मराठा समाज त्यांचे योगदान कधीही विसरणार नाही, असे कौतुकोद्गार शिवेंद्रसिंहराजे यांनी काढले.

मराठा समन्वयक समिती आणि सकल मराठा समाज यांच्या वतीने येथील शिवतीर्थावर शिवेंद्रसिंहराजे यांचा शाल श्रीफळ व फेटा घालून सत्कार करण्यात आला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सदस्य शरद काटकर विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे इत्यादी यावेळी उपस्थित होते.

शिवेंद्रसिंहराजे भोसले पुढे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्याची स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी वेळोवेळी घेतली आहे. ते ब्राह्मण प्रवर्गाचे आहेत. म्हणून मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, अशी भूमिका मांडली जात होती. मात्र, पहिल्या दिवसापासून फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी ठाम भूमिका घेतली. तत्कालीन २०१९च्या परिस्थितीमध्ये सुद्धा फडणवीस यांनी मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण दिले होते. ते न्यायालयाच्या चिकित्सा प्रक्रियेवर टिकले सुद्धा होते. महाविकास आघाडीच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने ते रद्द करावे लागले.

हैदराबाद गॅझेटिअरच्या आधारे निघणारा शासन निर्णय यामुळे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून मिळणारे आरक्षण हे दुसऱ्यांदा मिळत आहे. याचे सारे श्रेय मुख्यमंत्री फडणवीस यांचे आहे. राजघराण्याचा सदस्य म्हणून खासदार उदयनराजे भोसले व माझ्यावर काहीजणांनी टीका केली होती. मात्र, टीका करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की तुम्ही मराठा समाजासाठी काय केले. तुमच्या पक्षाने मराठा समाजासाठी काय केले. याबाबतची मांडणी आपण कधी तपासली का? असा जाहीर टोला शिवेंद्रसिंह राजे यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला.

मराठा मुख्यमंत्र्यांना जमले नाही ते…

मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी गेल्या वीस पंचवीस वर्षांची आहे. मात्र, मराठा समाजाचे अनेक नेते मुख्यमंत्री झाले. परंतु, कोणीही मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावला नाही, तसेच आरक्षणाच्या माध्यमातून झालेल्या आंदोलनाने ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. त्या संदर्भातही तातडीने ते गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रिये संदर्भात राज्य सरकार गंभीर आहे. त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मराठा आरक्षणाचा संपूर्ण निर्णय जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आपण साताऱ्यात जाहीर सत्कार घ्यावयाचा आहे, अशी घोषणा शिवेंद्रसिंहराजे यांनी केली.