हिंगोली : समृद्ध शेती करण्यासाठी मातीपरीक्षण आवश्यक असून, त्याप्रमाणे पीक घेणे सोयीचे होईल. ऊस उत्पादनात वाढ करावयाची असल्यास मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी ‘एआय’ तंत्रज्ञानाचा आवश्य वापर करावा. जगभरात एआयचे तंत्रज्ञान ऊस उत्पादन वाढीसाठी वापरले जात आहे, अशी माहिती बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राचे एआय विभाग प्रमुख तुषार जाधव यांनी केले.

वसमत येथे पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने शनिवारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘पूर्णा’चे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘एआय’ वरआधारित ऊसशेती या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. चर्चासत्रास बारामती येथील कृषी केंद्राचे एआय तज्ज्ञ डॉ. विवेक भोईटे, पुणे येथील शास्त्रज्ञ डॉ. अशोक कडलग, कार्यकारी संचालक केशव अंकुसकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

जाधव पुढे म्हणाले की, शेतात कोणते पीक घेणे योग्य राहिल, हे माती परीक्षणातून कळेल. त्यानुसार पिकाची निवड करता येईल. जगात सर्वत्र ऊस उत्पादक शेतकरी ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी आता मागे न राहता ‘एआय’ तंत्रज्ञान काय आहे ? याची पूर्ण माहिती घेऊन त्याचा उपयोग करावा. एआय तंत्रज्ञानाचा वापर झाला तर ऊस उत्पादन निश्चितच वाढेल, असे जाधव यांनी शेवटी सांगितले. यावेळी दांडेगावकर यांनी ‘एआय’ तंत्रज्ञान मदतीचे असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी, असे आवाहन केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.