Supriya Sule On Raj Thackeray and Uddhav Thackeray Alliance : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत बोलताना एक विधान केलं होतं. त्यांच्या त्या विधानानंतर मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चा सुरु झाल्या. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्याला प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं होतं. दरम्यान, त्यानंतर आता खुद्द उद्धव ठाकरे यांनी मनसेशी युती करण्याच्या संदर्भात सूचक भाष्य केलं.

‘महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल’, अशी सूचक प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना दिली. त्यांच्या या विधानानंतर आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. यावर आता राष्ट्रवादीच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत मनसेबाबत मोठं भाष्य केलं आहे. ‘राज ठाकरे हे महाविकास आघाडी किंवा उद्धव ठाकरे यांच्याबरोबर येणार असतील तर आम्ही स्वागत का करणार नाही?’, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

‘महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल’, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानासंदर्भातील प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “मी स्वागत करेन, कारण माझ्याही मनात तेच आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर आनंद आहे. कारण कोणत्याही दोन संघटना जर महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणार असतील तर स्वागत आहे. एका सशक्त लोकशाहीत कोणी कोणाबरोबर काम करायचं? हा त्यांचा अंतर्गत विषय आहे”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाविकास आघाडीपासून शिवसेना दूर जाईल असं वाटतं का? असा प्रश्न पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना विचारला असता त्या म्हणाल्या की, “राज ठाकरे हे महाविकास आघाडी किंवा उद्धव ठाकरे यांच्याबरोबर येणार असतील तर आम्ही स्वागत का नाही करणार?”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर राज ठाकरे महाविकास आघाडीत आले असा अर्थ घ्यायचा का? असंही विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “बघुया, महाराष्ट्राच्या हितासाठी ते जर एकत्र येणार असतील तर मी स्वागत करेन.”

उद्धव ठाकरे मनसेच्या युतीबाबत काय म्हणाले होते?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र कधी येणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राच लक्ष लागलं आहे. साद दिली, प्रतिसादही सकारात्मक आहे. मनसेकडून सांगितलं जात आहे की युतीचा प्रस्ताव पाठवा, यावर तुमची प्रतिक्रिया काय? असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी उद्धव ठाकरे यांना शुक्रवारी विचारला होता. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “ठीक आहे, बघुया, जे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे ते होईल”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तसेच मी तुम्हाला फक्त एका वाक्यात सांगितलं, याबाबत जे काही बारकावे आहेत ते आम्ही पाहात आहोत. तसेच मी तुम्हाला फक्त संदेश नाही तर थेट बातमी देईन. माझ्या शिवसैनिकांच्या मनामध्ये काहीही संभ्रम नाही. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की संदेश वैगेरे देण्यापेक्षा जी काही बातमी द्यायची ती आम्ही देऊ”, असं सूचक भाष्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं.