शिवसेना पक्षप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ जयंतीनिमित्त आज राज्यात दोन मोठे कार्यक्रम झाले. सरकारच्यावतीने विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण आज करण्यात आले. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. दोन्ही कार्यक्रमात बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत असताना राजकीय टोलेबाजी देखील करण्यात आली. या महत्त्वाच्या घडामोंडीबाबतच्या पाच महत्त्वाच्या राजकीय घडामोडींकडे लक्ष देऊ.
दुसऱ्यांचे वडील चोरताय, पण स्वत:चे वडील लक्षात ठेवा
जयंतीनिमित्त शिवसेनेकडून (ठाकरे गट) एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमातून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. सध्या देशात वडील चोरणारी औलाद फिरत आहे, असं मी दसरा मेळाव्यात म्हटलं होतं. दुसऱ्यांचा वडील चोरता-चोरता स्वत:चे वडील लक्षात ठेवा, नाहीतर त्यांना विसरायचे, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
ते पुढे म्हणाले, “आज बाळासाहेब ठाकरे, प्रमोद नवलकर आणि सुभाषबाबुंचा जन्मदिवस आहे. आज विधानभवनात तैलचित्राचं अनावरण होतंय. मला दुपारी तैलचित्राबद्दल विचारलं, तेव्हा मी म्हटलं मी अजून तैलचित्र बघितलं नाही. ज्या कलाकाराने चित्र चितारलं असेल, त्यांचा मला अपमान करायचा नाही, पण हे चित्र काढण्यासाठी पुरेसा वेळ दिला का? हे विचारणं गरजेचं आहे. घाई-गडबडीत काहीतरी रंगवून ठेवायचं आणि म्हणायचं ‘हे घे तुझे वडील’ असं अजिबात चालणार नाही.” संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा
निवडणूक जिंकायची असेल तर बाळासाहेबांशिवाय पर्याय नाही
निवडणूक जिंकायची असेल तर बाळासाहेबांशिवाय पर्याय नाही हे आजही सत्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही ते मान्य आहे. त्यामुळेच तर खोकेवाले बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरत आहेत. आज तुम्हाला आव्हान देतो जर हिंमत असेल तर निवडणुका घ्या. आम्ही बाळासाहेबांचा फोटो घेऊन येतो. तुम्ही मोदींचा फोटो घेऊन या. बघू लोक कुणाला मत देतात? असं थेट आव्हान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही त्यांनी आज निशाणा साधला. तसंच शिंदे गटाला मिंधे गट असं म्हणत टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त खास कार्यक्रम मुंबईतल्या षण्मुखानंद हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा
मी बाळासाहेबांचा वैचारिक वारसदार – राज ठाकरे
स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ जयंतीनिमित्त विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण आज करण्यात आले. यावेळी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या खुमासदार शैलीत भाषण करत स्व. बाळासाहेबांच्या आठवणी सांगितल्या. मी बाळासाहेबांचा वैचारीक वारसदार असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात जबरदस्त टोलेबाजी केली. या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित असलेले अनेकजण आणि उपस्थित नसलेले अनेकजण… यांना उद्देशून राज ठाकरे म्हणाले, “ज्या व्यक्तीमुळे ही विधानभवनाची इमारत तुम्हाला बघायला मिळाली त्या स्व. बाळासाहेब ठाकरेंचे तैलचित्र या इमारतीमध्ये लागत आहे, त्याबद्दल अभिमान वाटतो. शेकड्याने लोक विधानभवनात आली, मा. बाळासाहेबांनी त्यांना इथे पाठवले. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विनंती आहे की, त्यांनी विधानसभा आणि विधानपरिषदेतही बाळासाहेबांचे तैलचित्र लावावे. म्हणजे आपण कुणामुळे विधान भवनात आलो, हे त्यांना कळेल.” संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा
स्व. बाळासाहेब ठाकरेंना हिंदू धार्जिणे म्हणणे अर्धसत्य – अजित पवार
स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ जयंतीनिमित्त विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहातील बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्यात सरकारच्यावतीने अनेकांची भाषणे झाले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे देखील यावेळी भाषण झाले. ते म्हणाले की, बाळासाहेबांचे विचार पुढे नेत असल्याचा दावा करत असताना जे पोटात, तेच ओठात, बोलणं एक आणि करणं एक, असे न करता बाळासाहेबांचे हे गुण आत्मसात आणण्याचा प्रयत्न आपण केला पाहीजे, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली. तसेच या तैलचित्रावर असलेल्या हिंदूहृदयसम्राट या उल्लेखावर आक्षेप घेत तिथे शिवसेना पक्षप्रमुख हिंदूहृसम्राट असा उल्लेख असावा, अशी मागणी अजित पवार यांनी केली. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा
बंडखोरी केलेले ४० दगड… – संजय राऊत
उद्धव ठाकरे यांच्या जयंतिनिमित्त उद्धव ठाकरे गटाने षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले. तर दुसरीकडे विधानभवनात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येत आहे. षण्मुखानंद येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी दमदार भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणात बंडखोरी केलेल्या आमदारांवर खरपूश शब्दांत टीका केली. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा संदर्भ देत एका दगडाची गोष्ट सांगितली. ही गोष्ट ऐकल्यानंतर भाषण ऐकत असलेल्या श्रोत्यांनी शिट्ट्या वाजवत टाळ्यांचा कडकडाट केला. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा