एकनाथ शिंदेंसोबत ४० शिवसेना आमदारांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर सरकार अल्पमतात आल्याचं चित्र निर्माण झालं आहे. त्यामुळे सरकार कोसळणार असल्याची शक्यता वर्तवली जात असताना सत्ताधाऱ्यांकडून मात्र अल्पमतात आलो नसल्याचा दावा केला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना उद्देशून भाषण केलं. यावेळी त्यांनी बंडखोर शिवसेना आमदारांना आणि एकनाथ शिंदे यांना देखील सुनावलं आहे.

उद्धव ठाकरेंनी सांगितली ‘ती’ आठवण

उद्धव ठाकरेंनी यावेळी त्यांची पक्षप्रमुख पदावर निवड झाली तेव्हाची आठवण सांगितली. तेव्हा पक्षांतर्गत नाराजीविषयी बोलताना बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली भूमिका त्यांनी सांगितली. “मी बाळासाहेबांना म्हणालो हे सगळे काय करतायत ते तुम्ही तरी थांबवा. ते मला म्हणाले मी मध्ये नाही पडणार. त्यांचा निर्णय त्यांना घेऊ दे. मग शेवटी तो ठराव मंजूर झाल्यानंतर शिवसेना प्रमुखांनी सगळ्यांना विचारलं होतं की हे जे सगळं केलंय, ते तुम्हाला मान्य आहे का?” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उल्हासनगरात खासदार श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय फोडले; शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी!

दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना परखड शब्दांत सुनावलं. “काय तुमचं कर्तृत्व? हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मतं मागा”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. “आधी नाथ होते, आता दास झाले. बंडखोरांनी त्यांचा निर्णय घ्यावा. बाळासाहेबांचं नाव दुसऱ्यांना वापरता येणार नाही. शिवसेना निखारा आहे. पाय ठेवाल तर जळून जाल”, असं देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

“देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा झाली, त्यांनी सांगितलंय की…”, रामदास आठवलेंनी दिला सविस्तर तपशील!

“शिवसेनाप्रमुखांपेक्षा माझ्यावर काकणभर जास्त प्रेम”

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा आपल्यावर शिवसेना कार्यकर्त्यांचं काकणभर जास्तच प्रेम आहे, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. “शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हणून अनेकांना मी सांगतो. तुम्ही हसाल. पण जर शिवसैनिकांना विचारलं तर तो शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांपेक्षा माझ्यावर काकणभर जास्तच प्रेम करत असेल. कारण केवळ मी त्यांचा मुलगा आहे म्हणून”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.