ऐश्वर्या राय बच्चन हे नाव सध्या तिच्या ‘कमबॅक’साठी गाजते आहे. संजय गुप्ता दिग्दर्शित ‘जझबा’ या चित्रपटातून ऐश्वर्या रुपेरी पडद्यावर पुनरागमन करते आहे. या चित्रपटात तिची मध्यवर्ती आणि महत्त्वाची भूमिका आहे. शिवाय या चित्रपटासाठी आपल्याबरोबर नायक म्हणून ऐश्वर्यानेच स्वत: इरफान खानसारख्या सक्षम कलाकाराची निवड केली आहे. त्यामुळे तिच्या या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहेच. पण तिच्या नवीन चित्रपटाबद्दलही सध्या कुतूहल निर्माण झाले आहे. करण जोहरच्या आगामी चित्रपटात ऐश्वर्या, रणबीर आणि अनुष्का शर्मा तिघेही काम करत आहेत. पण आता या चित्रपटात ऐश्वर्या चक्क रणबीरची नायिका बनणार असल्याची चर्चा आहे.
करण जोहरच्या आगामी ‘ऐ दिल है मुश्कील’ चित्रपटाबद्दल जाहीर घोषणा करण्यात आल्यापासूनच या चित्रपटाबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दिग्दर्शक म्हणून करणचा हा सातवा चित्रपट असल्याने कथेपासून कलाकारांपर्यंत करण जोहरने वेगळेपण राखण्याचा प्रयत्न केला आहे. गेली कित्येक वर्षे ऐश्वर्याबरोबर काम करण्याची इच्छा करणच्या मनात होती. या चित्रपटाच्या निमित्ताने आपली ती इच्छा पूर्ण केली आहे. पण, ऐश्वर्याबरोबर रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा दोघांचीही निवड करून करणने आश्चर्याचा धक्का दिला होता. या चित्रपटात रणबीर आणि अनुष्का ही जोडी प्रेमिकांच्या रूपात दिसणार हे साहजिक आहे. मात्र, ऐश्वर्या या प्रेमकथेचा तिसरा कोन असणार आहे. त्यामुळे पहिल्यांदाच ऐश्वर्या रणबीर कपूरची नायिका म्हणून लोकांसमोर येणार आहे.
‘रोमकॉम’चा बादशहा असलेल्या दिग्दर्शक करण जोहरने आपल्या नव्या चित्रपटासाठी नवी मांडणी केली आहे. यावेळी पहिल्यांदाच प्रेमकथा न सांगता हरवलेल्या प्रेमाची कथा करण सांगणार आहे. यश चोप्रांच्या ‘दुसरा आदमी’ या १९७७ सालच्या चित्रपटावरच करणचा ‘ऐ दिल है मुश्कील’ हा चित्रपट बेतला असल्याचे सांगण्यात येते. राखी, ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटात पतीच्या (शशी कपूर) निधनानंतर निराश झालेली राखी त्याच्यासारख्याच दिसणाऱ्या ऋ षी कपूरच्या प्रेमात पडते, असे दाखवण्यात आले आहे. करणने याच कथानकाचा आधार घेतला असून नव्या चित्रपटात राखीची भूमिका ऐश्वर्या साकारताना दिसणार आहे. ऐश्वर्याच्या पतीची भूमिका सैफ अली खान साकारणार असून ऋषी कपूर आणि नीतू सिंगच्या भूमिकेत अर्थातच रणबीर-अनुष्का ही जोडी दिसणार आहे. मात्र चित्रपटाच्या कथानकानुसार प्रत्यक्ष पडद्यावर ऐश्वर्या आणि रणबीर प्रेमिकांच्या भूमिकेत दिसणार आहेत.