दिल्लीतील प्रदूषण हा ज्वलंत प्रश्न बनला आहे. प्रदूषणामुळे तिथल्या शाळांना सुट्टीसुद्धा जाहीर करण्यात आली होती. या वायू प्रदूषणाचा फटका चित्रपटसृष्टीलाही बसत आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियाद्वारे दिल्लीतील प्रदूषणावर चिंता व्यक्त केली आहे. तर अभिनेता कार्तिक आर्यन व जान्हवी कपूरने त्यांच्या आगामी ‘दोस्ताना २’ या चित्रपटाची शूटिंग रद्द केली आहे.

नुकतीच या चित्रपटाची शूटिंग सुरु झाली असून चंदीगडमधील भाग संपला. त्यानंतर दिल्लीत पुढील शूटिंग होणार होतं. मात्र दिल्लीतील प्रदूषणामुळे चित्रपटाच्या टीमने शूटिंग रद्द करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीत मोकळा श्वास घेणंही चित्रपटाच्या टीमला कठीण जात होतं. दृश्यमानता कमी झाल्याने कॅमेऱ्यात व्यवस्थित शूट करता येत नव्हतं. त्यामुळे जोपर्यंत वातावरणात सकारात्मक बदल घडत नाहीत तोपर्यंत दिल्लीतील शूटिंग रद्द करण्यात आली आहे.

आर. माधवनच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का?

‘दोस्ताना २’मध्ये कार्तिक व जान्हवीसोबतच लक्ष्य हा अभिनेता मुख्य भूमिका साकारत आहे. लक्ष्यचा हा पहिलाच चित्रपट आहे. २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दोस्ताना’ या चित्रपटाचा हा सीक्वल आहे. ‘दोस्ताना’मध्ये प्रियांका चोप्रा, अभिषेक बच्चन व बॉबी देओल मुख्य भूमिकेत होते.