टेलिव्हजन जगतात टीआरपीमध्ये बराच काळ अग्रस्थानी राहिलेली ‘दिया और बाती हम’ मालिका बंद होऊन सात महिने उलटले. त्यानंतर आता लवकरच या मालिकेचा सिक्वल येणार असल्याचे कळते. ‘दिया और बाती हम’ या मालिकेचा दुसरा सिझन ‘तू सूरज मै सांझ पिया जी’ या नावाने लवकरच सुरु होणार आहे.

केरळ येथे रविवारी या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली.  ‘दिया और बाती हम’ मालिकेत भाभो या भूमिकेने प्रसिद्धीस आलेल्या अभिनेत्री नीलू वांगेला यांनी ‘तू सूरज मै सांझ पिया जी’ या सिक्वलची अधिकृत घोषणा केली. यावेळी त्या म्हणाल्या की, तुम्ही सूरज आणि संध्या या पात्रांना खूप प्रेम दिलेत. पण, आता त्यांच्या अनुपस्थितीत ही कथा पुढे जाणार आहे. पहिल्या सिझनमधील केवळ भाभो आणि मिनाक्षी ही दोनच पात्रं पुढच्या सिझनमध्ये दिसणार आहेत. पहिल्या सिझनमध्ये सूरज आणि संध्याचा मृत्यू झाल्याचे दाखविण्यात आले होते. तेथूनच आता पुढे मालिकेच्या दुस-या सिक्वलची सुरुवात होणार आहे. ‘तू सूरज मै सांझ पिया जी’ मध्ये मालिका २० वर्ष पुढे सरकलेली दाखविण्यात येणार असून भाभो ही व्यक्तिरेखा आता यात प्रमुख भूमिकेत दिसेल. आयुष्यात इतके मोठे वादळ आल्यानंतरही त्यास सामोरं गेलेली भाभो पूर्वीप्रमाणेच कणखर असलेली तुम्हाला यात पाहायला मिळेल, असे नीलू म्हणाल्या. राठींच्या कुळात आता नव्या सदस्यांचा समावेश होईल. मी साकारत असलेली व्यक्तिरेखा नव्या पिढीचे स्वागत करेल. लवकरात लवकर सुरु होणारा हा सिझन तुमच्यापर्यंत यशस्वीपणे पोहचवणं हे आमच्यापुढे एक आव्हान आहे. पण, त्याचवेळी नव्या सिझनमधून आम्ही नवीन गोष्टी तुमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी उत्सुकही आहोत, असेही त्या म्हणाल्या.

पहिल्या सिझनमधील काही गोष्टी या सिझनमध्येही दिसणार असून त्यामुळे या कौटुंबिक मालिकेला आणखी तडका लागणार आहे. काही कौटुंबिक समस्या पहिल्या सिझनमध्ये दाखविण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे या सिझनमध्येही तसे काही किस्से पाहायला मिळतील. ‘दिया और बाती हम’मध्ये कुटुंबातील व्यक्तींमध्ये एकमेकांसाठी असलेले प्रेम, काळजी, त्यांच्यातील वाद यातही पाहावयास मिळतील. प्रेक्षक या नव्या सिझनचे स्वागत करतील अशी अपेक्षा आहे, असेही नीलू म्हणाल्या.

‘दिया और बाती हम’मध्ये दीपिका सिंह आणि अनस रशीद यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. तर ‘तू सूरज मै सांझ पिया जी’ मध्ये आता रेहा शर्मा आणि अविनाश रेखी हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत.