छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘कसौटी जिंदगी की २.’ या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. तसेच मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. या मालिकेत अनुराग बासूची भूमिका साकारणारा अभिनेता पार्थ समथान सर्वात जास्त चर्चेत होता. करिअर लोकप्रियतेच्या शिखरावर असताना पार्थने टेलिव्हिजन विश्वापासून लांब जाण्याचा निर्णय घेतला आहे.

पार्थ सध्या वेब सीरिजच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने ब्रेक घेणार असल्याचे म्हटले आहे. ‘वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करुन मला आनंद झाला आहे. त्यामुळे आता मी टेलिव्हिजन विश्वापासून ब्रेक घेणार आहे. मला तेथे पुन्हा काम करण्याची इच्छा नाही’ असे पार्थ म्हणाला.

पुढे तो म्हणाला, ‘जेव्हा मी पहिला शो केला तेव्हा मी या इंडस्ट्रीमध्ये नवीन होतो. पण कसोटी जिंदगी की ही मालिका केल्यानंतर सगळे काही बदलले. माझे मित्र, परिवार, शेजारी सगळे मला ओळखू लागले आहेत.’

पार्थने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्याने ‘यह है आशिकी’, प्यार तूने क्या किया, सावधान इंडिया अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की २’ या मालिकेती अनुराग हे त्याचे पात्र विशेष गाजलं. या मालिकेने त्याला ओळख मिळवून दिली.