अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर सातत्यानं भाष्य करत असलेल्या अभिनेत्री कंगना रणौतनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने सोशल नेटवर्किंगवरुन संताप व्यक्त केला जात आहे. याच वक्तव्यावरुन मराठी निर्माते व दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी 'कंगना तुझं चुकलंच' म्हणत तिला सवाल केला आहे. "अनेक कलाकार स्वप्न उराशी बाळगून मुंबईत येतात. इथेच राहून अनेकांसारखं तूही शून्यातून विश्व निर्माण केलं आहेस. मुंबई शहराने तुझ्या माझ्यासारख्या अनेकांना डोक्यावर छप्पर, नाव, पैसा मिळवून दिला. काश्मीरमध्ये माझे काही मित्र आहेत त्यांच्याकडून त्यांचे अनुभव ऐकतो तेव्हा कळतं की मुंबईत राहून आपण सुखाने आपली रोजी रोटी कमवू शकतो. इथे काम करताना डोक्यावर कोणती टांगती तलवार नसते. अगदी निर्धास्त, निर्भिडपणे आपण आपल्या कलेच्या जोरावर इथे पाय रोवून आहोत. हे सगळं कुणामुळे? तर या मुंबईने, इथल्या माणसांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपल्याला उडण्यासाठी, पुढे जाण्यासाठी बळ, प्रोत्साहन दिलं आहे म्हणून. मग याची कसली जाणीव न ठेवता इतकी वर्षे मुंबईत राहून आत्ताच तुला पाकव्याप्त काश्मीरमध्ये असल्याची भावना का होते," असा सवाल महेश टिळेकर यांनी कंगनाला केला. आणखी वाचा : . माती होण्याआधी सावर कंगना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्याला मुंबईत न येण्याची धमकी दिली असून मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे अशी टीका कंगनाने ट्विटरवरुन केली आहे. कंगनाच्या या टीकेवर मराठी कलाकार चांगलेच संतापले असून त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपला भावना व्यक्त केल्या आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनीही कंगाणाच्या मुंबईसंदर्भातील वक्तव्याचा विरोध केला आहे.