आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे तब्बू. बॉलिवूडमध्ये एकेकाळी तब्बू आणि अभिनेता अजय देवगण यांची जोडी हिट होती. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये देखील एकत्र काम केले आहे. तसेच त्यावेळी त्या दोघांच्या अफेअरच्या चर्चा देखील रंगल्या होत्या. पण अजयने काजोलशी लग्न करताच या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला. तब्बू मात्र आजही अविवाहित आहे. नुकताच एका मुलाखतीमध्ये तिने अजयमुळे लग्न न केल्याचा खुलासा केला आहे.

तब्बूने नुकताच ‘मुबंई मिरर’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने आत्तापर्यंत सिंगल असण्यामागचे कारण सांगितले आहे. ‘मी अजयला गेल्या २५ वर्षांपासून ओळखते. अजय माझा चुलत भाऊ समीरच्या शेजारी राहायचा आणि त्या दोघांमध्ये चांगली मैत्री होती. त्यामुळे आम्ही एकत्र लहानाचे मोठे झालो आणि आमच्यामध्ये चांगली मैत्री देखील होती. जेव्हा मी तरुण होते तेव्हा समीर आणि अजय माझ्यावर लक्ष ठेवायचे. मी जिकडे जाईन तिकडे माझा पाठलाग करायचे आणि जर एखाद्या मुलाने माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तर हे दोघेही त्याला मारण्याची धमकी द्यायचे. मी आज सिंगल आहे त्याचे कारण म्हणजे अजय आहे’ असा खुलासा तब्बूने केला आहे.

त्यानंतर तब्बूला तू लग्न कधी करणार असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने मजेशीर अंदाजात उत्तर दिले आहे. ‘मी अजयला सांगितले होते मला लग्नासाठी एक मुलगा बघ’ असे तब्बू म्हणाली.

तब्बू आणि अजयने आतापर्यंत ‘विजयपथ’, ‘हकीकत’, ‘तक्षक’, ‘दृश्यम’, ‘गोलमाल अगेन’, ‘दे दना दन’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.