बॉलिवूडचं क्यूट कपल आलिया भट्ट आणि रणबीर सिंह नुकतेच करोनातून बरे झाले आहे. करोनातून बाहेर पडताच आलिया आणि रणबीरने थेट मालदीव गाठलं आहे. दोघांनाही मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं होतं. मुंबईत लॉकडाउन जाहीर झाल्याने दोघांनी एकत्र वेळ घालवण्यासाठी मालदीवला जाणं पसंत केलं. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हाय़रल होत असतानाच आता नेटकऱ्यांनी आलिया रणबीरला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईसह राज्यात आणि देशात गंभीर स्थिती निर्माण झाली असताना दोघांनी पळ काढल्याचं नेटिझन्स म्हणत आहेत.
आलिया भट्ट आणि रणबीर सिंह सोमवारी सकाळी मालदीवला रवाना झाले. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने एअरपोर्टरली एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात रणबीर आणि आलिया विमानतळावर स्पॉट झाल्याचं दिसतंय. मात्र या व्हिडीओवर अनेकांनी दोघांना ट्रोल केलंय.
View this post on Instagram
अनेकांनी आलिया आणि रणबीरच्या फोटोवर कमेंट करत त्यांना पळपुटे म्हंटलं आहे. एक युजर म्हणाला आहे. “अशिक्षितपणाचा कहर. हे कलाकार किती उत्तम उदाहरण तयार करत आहेत” तर दुसरा युजर म्हणाला आहे. ” निर्लज्ज लोक, देश कठीण परिस्थितीचा सामना करत आहे, मदत करण्याएवजी हे सुट्टी एन्जॉय करत आहेत.”
तर एक नेटकरी म्हणाला, ” आता या सगळ्यांना काय म्हणायचं, पळपुटे?” तसचं अनेक नेटकऱ्यांनी सध्य़ा मालदीवला जाणाऱ्या सेलिब्रिटींवर निशाणा साधत आलिया- रणबीरला ट्रोल केलं आहे. “सध्या सर्वच सेलिब्रिटी मालदीवला जात आहेत. तिथली सरकार भंडारा वाटतेय का? तिथे करोना नाही का?” असे सवाल उपस्थित करत नेटकऱ्यांनी ट्रोल केलंय.
गेल्या काही दिवसात अनेक सेलिब्रिटींनी मालदीवमध्ये जाऊन वेळ घालवणं पसंत केलंय. नुकतीच अभिनेत्री दिशा पटानीदेखील मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करतेय.