बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान त्याच्या कामामुळे तर चर्चेत राहतोच; पण अनेकदा तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असतो. त्याने दोन महिन्यापुर्वी स्वत:च्या वाढदिवशी प्रेयसी गौरीची स्प्रॅटची सर्वांना ओळख करून दिली आणि आपल्या नव्या नात्याची कबुली दिली होती. आमिर खानचे याआधी रीना दत्ता आणि किरण रावबरोबर लग्न झाले आहे.

आमिरने त्याच्या दोन्ही पत्नींपासून घटस्फोट घेतला असला, तरी पूर्वाश्रमीच्या दोन्ही पत्नींशी त्याचे चांगले संबध आहेत. आयुष्यातली ही दोन्ही नाती तुटल्यानंतर तो खूप दु:खी झाला होता आणि त्याच्या आयुष्यातील प्रेमाची आशाही संपली होती. पण नंतर गौरी त्याच्या आयुष्यात प्रेमाची नवी आशा म्हणून आली. याबद्दल स्वत: आमिरने राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं की, गौरीने माझ्या आयुष्यातली प्रेमाची पोकळी भरून काढली.

गौरीबरोबरच्या नात्याबद्दल आमिर खान म्हणाला, “गौरी आणि मी चुकून भेटलो आणि आम्ही एकमेकांशी जोडले गेलो. आमची मैत्री वाढत गेली, मग हळूहळू प्रेम आणि आदर वाढला. माझ्याकडे कधीच काही योजना नव्हत्या. मला फक्त असं वाटायचं की, मला मुलं आहेत, आई आहे, भाऊ आणि बहिणी आहेत. ही नाती माझ्या इतक्या जवळची आहेत की, मला जोडीदाराचीही गरज नाही.”

यापुढे आमिर किरण आणि रीना यांच्याबरोबरच्या नात्याबद्दल म्हणाला, “किरण, रीना आणि मी अजूनही पाणी फाउंडेशनमध्ये एकत्र काम करतो. आम्ही रोज बोलतो. आमच्यात एका कुटुंबासारखे चांगले नाते आहे. आम्ही तिघेही आता पती-पत्नी नसू शकतो, पण आम्ही निश्चितच एक कुटुंब म्हणून एकत्र राहू. ते माझ्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग आहेत आणि कायमच राहतील.”

यानंतर आमिर खानने एकटेपणाबद्दलही सांगितले की, “माझ्या आयुष्यात अशी संधी कधीच आली नव्हती. माझ्या आजूबाजूला कुटुंबातील इतके सदस्य होते की, मला एकटेपणा जाणवलाच नाही. मी कायम कुटुंबाच्या माणसांमध्ये राहिलो आहे. त्यामुळे मला कधीही एकटे वाटले नाही. कुटुंबाशिवाय मी सिनेमात इतका रमलो होतो की, माझ्या मनात एकटेपणाची कल्पनाही येत नव्हती.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमिर खान आणि रीना दत्ता यांनी १९८६ मध्ये लग्न केले. २००२ मध्ये ते विभक्त झाले. त्यांना जुनैद खान आणि आयरा खान ही दोन मुलं आहेत. त्यानंतर आमिरने २००५ मध्ये किरण रावशी लग्न केले. पण हे लग्नही टिकले नाही. २०२१ मध्ये ते दोघे वेगळे झाले. दोघांना आझाद राव हा मुलगा आहे. अशातच आमिरने मार्च महिन्यात त्याच्या नव्या प्रेमाबद्दल खुलासा करताना गौरीबद्दल सांगितलं.