बॉलीवूडमध्ये काही चित्रपट असे आहेत, ज्यांचा वेगळा चाहता वर्ग आहे. त्यापैकी ‘गोलमाल’ हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे चार भाग आतापर्यंत आले आहेत आणि गोलमाल सीरिजच्या चारही भागांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. आता ‘गोलमाल ५’ हा चित्रपट कधी येणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे. आता चित्रपटाचा दिग्दर्शक रोहित शेट्टीने यावर मोठे वक्तव्य केले आहे.

काय म्हणाला रोहित शेट्टी?

रोहित शेट्टीने नुकतीच ‘पिंकविला’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये रोहित शेट्टीने ‘गोलमाल ५’ या चित्रपटाबद्दल वक्तव्य केले आहे. तो म्हणाला, “गोलमाल सीरिज कायम बनत राहील. चित्रपट बनणार नाही, असे होणार नाही. या चित्रपटावर काम सुरू आहे. मात्र, त्यासाठी अजून वेळ लागेल.” याआधी दिलेल्या एका मुलाखतीत त्याने म्हटले होते की, येत्या दोन वर्षांत तुम्हाला ‘गोलमाल ५’ चित्रपट पाहायला मिळेल. हा चित्रपट आधीच्या चित्रपटांपेक्षा वेगळा असेल. हा कॉमेडी चित्रपट असून तो मी ॲक्शन चित्रपटांसारखा बनवू शकत नाही. या चित्रपटाचा खास चाहतावर्ग असून त्यांच्यासाठी ही सीरिज कायम सुरू राहणार, असं तो म्हणाला होता.

हेही वाचा: “नवसाची गौराई माझी…”, नवऱ्यासह रोमँटिक डान्स करत पूजा सावंतने परदेशातून शेअर केला व्हिडीओ, भूषण प्रधानला म्हणाली…

२००६ साली ‘गोलमाल फन अनलिमिटेड’ हा चित्रपट आला होता. लकी, माधव, लक्ष्मण, गोपाळ या चार पात्रांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. अजय देवगण, तुषार कपूर, अर्शद वारसी, संजय मिश्रा यांनी ही पात्रे साकारली होती. त्यानंतर या चित्रपटाचा सिक्वेल ‘गोलमाल रिटर्न्स’ हा २००८ ला प्रदर्शित झाला होता. त्यानंतर २०१० ला ‘गोलमाल ३’ आणि २०१७ ला ‘गोलमाल अगेन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. महत्त्वाचे म्हणजे, गोलमालच्या चारही भागांना प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाल्याचे पाहायला मिळाले होते. रोहित शेट्टी यांनी या ‘गोलमाल’ चित्रपट सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. आता चाहत्यांना ‘गोलमाल ५’ ची उत्सुकता लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगण, अक्षय कुमार, विकी कौशल, टायगर श्रॉफ, दीपिका पदुकोण, रणवीर सिंह, करीना कपूर खान, अर्जुन कपूर हे दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आता बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कमाई करण्यात यशस्वी होणार का? प्रेक्षक या चित्रपटाला कसा प्रतिसाद देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.